जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे जम्मू-काश्मीरमधील मेंढर आणि उरी येथील काही भागात प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून रस्त्यावर उभी केलेली अनेक वाहने पाण्यात वाहून गेली आहे . पुंछच्या मेंढरमध्ये सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.मेंढर ते पूंछपर्यंतचा रस्ता पूर्णपणे ठप्प झाला होता.
यासह इतर ग्रामीण भागातही पाण्याचा जोरदार प्रवाह दिसून आला. पावसामुळे नागरिकांना नद्यांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुसळधार पावसानंतर अनेक भागात पूर आला आहे. गंदेरबल जिल्ह्यात पावसामुळे अनेक गावे जलमय झाली आहेत. लष्कर, पोलीस, एसडीआरएफ आणि सीआरपीएफ पावसाचे पाणी गावात पोहोचू नये यासाठी व्यस्त आहेत.
दुसरीकडे पूंछ जिल्ह्यातील मेंढर उपविभागात सुरू असलेल्या पावसामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मेंढरच्या छत्राल भागात नदीच्या मध्यभागी जोरदार प्रवाहात अडकलेल्या चार जणांची सुटका करण्यात आली आहे. पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. नद्यांच्या जवळ थांबू नये, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये हवामान खराब आहे. १८ एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध भागात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
त्याच वेळी, जम्मू आणि काश्मीर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (JKDMA) ने काश्मीर खोऱ्यातील दोन जिल्हे कुपवाडा आणि गंदरबल या उच्च उंचीच्या भागात हिमस्खलनाचा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १७ एप्रिलपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पूंछ-राजोरी ते शोपियान यांना जोडणारा मुघल रस्ता बर्फवृष्टीमुळे पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आला होता. किश्तवाड जिल्ह्यात दिवसभर पाऊस सुरूच होता. सिंथन टॉपसह डोंगराळ भागात बर्फवृष्टी झाली आहे.
दरम्यान एका बाजूने काश्मीर खोऱ्यात निसर्गाचा प्रकोप होत असतानाच, झेलम नदीत शालेय मुलांना घेऊन जाणारी होडी पलटल्याने ६ मुलांचा मृत्यू झाला तर १२जणांना वाचवण्यात यश आले आहे. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात तीन मुले बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. शोध मोहीम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ७२ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे झेलम नदी धोक्याच्या पातळीनजीक पोहोचली आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक तैनात करून बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झेलम नदी तसेच तलाव आणि जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.