आईने दिला 'हा' सल्ला आणि पालटले संजूचे नशीब
कधी कधी एक गाणं अजरामर होतं. त्यासाठी काही काळ जातो. कोलावरी डी, सैराटमधील वेड लागलं, झिंगाट, पुष्पामधील श्रीवल्लीसह अन्य सुपरहीट गाणी, बहरला मधुमास, मानिके मागे हीथे अशा काही गाण्यांनी गेल्या काही वर्षांत भाषेच्या बंधनांवर मात करून सर्वच रसिकांना भुरळ घातली. सोशल मीडियावर सातत्याने अनेक गाणी ट्रेंड होत असतात. एखादे गाणे ट्रेंड झाले की त्याचे रिल्स पाहायला मिळतात. महत्त्वाचे म्हणजे अगदी सामान्य व्यक्तींपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वच जण ट्रेंडिंग गाण्यावर रिल्स करतात.
अशातच सध्या सोशल मीडियावर फक्त एकाच गाण्याची चर्चा सुरू आहे. ‘गुलाबी साडी’ हे गाणं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. सध्या ‘गुलाबी साडी’ हे गाणे प्रचंड फॉर्ममध्ये आहे. एकट्या इंस्टावर या गाण्याने २५ लाखांपेक्षा अधिक व्यूज मिळवले आहेत. आणि त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.
नुकतेच हे गाणे न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर झळकले होते. इथे झळकणारे हे पहिले मराठी गाणे आहे. यावरूनच जगभरात या गाण्याच्या वाढत्या क्रेझचा अंदाज येऊ शकतो. गुलाबी साडीवर अनेक ट्रेंडिंग रील व्हीडिओ तुफान व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. कलाकार मंडळींपासून ते अगदी सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाला या गाण्याने भुरळ घातली आहे. या गाण्याचे बोल आणि गाण्याच्या हुकस्टेपने साऱ्यांनाच वेड लावले आहे.
माधुरी दीक्षित, रेमो डिसोझा, प्रार्थना बेहेरे यांनाच नाही तर मुंबई इंडियन्स टीमधील खेळाडूंना देखील या गाण्यावर रील्स करण्याचा मोह आवरला नाही. ब्राजिल, आफ्रिकेतील देश, फ्रान्स, स्पेन, इंडोनेशिया, थायलंड आणि जगभरातील अनेक देशांत या गाण्याने विविध माध्यमांवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या गाण्याच्या गायकाची देखील चर्चा होत आहे. यापूर्वी देखील गायक संजू राठोडने गायलेले ‘नऊवारी साडी पाहिजे’, या गाण्याने देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्याप्रमाणे हे गाणे देखील चांगलेच चर्चेत आले आहे. जाणून घेऊया या गाण्याच्या निर्मितीपासूनचा प्रवास आणि या गाण्याच्या निर्मात्याविषयी.
संजू हा जळगावच्या धानवड तांड्यात राहणारा आहे. कॉलेजमध्ये असतानाच संजूला गाण्याची आवड लागली. संजूने सुरुवातीला अनेक हिंदी गाणी गायली होती. पण, त्याला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
संजूने सुरुवातीला हिंदी गाणी गायली. पण, हिंदी गाण्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. सलग आलेल्या अपयशाने खचलेल्या संजूने आपल्या आईकडे मन मोकळे केले. आईने त्याला धीर दिला व आलेल्या अपयशाने कच न खाता आपल्या दृष्टिकोन बदलून पुन्हा कामाला लागण्याचा सल्ला दिला. संजूने ही गोष्ट मनावर घेतली आणि विघ्नहर्ता गणेशावर एक गीत लिहिले. हे गाणे म्हणजे ‘बाप्पा वाला गाना’. हे गाणे संजूने मराठीत लिहिले. गाणे रिलीज होताच लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. या गाण्यामुळे आणि प्रेक्षकांनी दिलेल्या भरपूर प्रेमामुळे संजूचा आत्मविश्वास बराच वाढला. आईचा सल्ला आणि बाप्पांचा आशीर्वाद यामुळेच आपल्याला प्रेम आणि यश मिळाले असे मागे एका पुरस्कार सोहळ्यात संजूने सांगितले होते.
गुलाबी साडी, नऊवारी पाहिजे, बाप्पा वाला गाना, बुलेट वाली, झुमका, डिंपल या संजू राठोडच्या गाण्यांना प्रेक्षकांनी अगदीच उचलून धरले.
एका मुलाखतीत गाण्याच्या एकूण निर्मितीबद्दल विचारले असता संजूने मोकळेपणाने सांगितले की, गाणे लिहितांना एक कविताच म्हणून लिहिणे सुरू केले होते. दिवाळीत ते लिहायला सुरुवात केली. या आधी माझी ‘प्रेमाचा रंग गुलाबी आहे आणि नऊवारी' ही गाणी बऱ्यापैकी चालली होती. याच दरम्यान मी क्रिएटिव्ह ब्लॉकमधून जात होतो. त्यामुळे आता काय लिहायचे हा प्रश्न होताच. काय लिहावे, हा प्रश्न पुन्हा आईनेच सोडवला. आईच्या सल्ल्याने माझीच जुनी गाणी ऐकून काढली, मग असाच बसलो असता ‘प्रेमाचा रंग गुलाबी आहे आणि नऊवारी’ या माझ्याच गाण्यावरून ‘गुलाबी साडी’ लिहून काढले.
फायनल करण्यापूर्वी त्यात अनेक बदलही केले. जे काही त्यानंतर झाले, ते सर्वांसमोर आहेच.." बऱ्याचदा यश हे सहसा मिळत नाही. जरासा सकारात्मक दृष्टिकोन बाळगून काम केले, किंवा काम आणि विचार करण्याची शैली बदलली तर तुम्ही नक्कीच यशस्वी होता. पण माझ्या यशात माझ्या आईचा आणि बाप्पांचा खूप मोठा वाटा आहे, असे त्याने सांगितले.