श्रीनगर : काश्मीरमध्ये लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू आहे. या दरम्यान, राजौरीपासून २५ किमी अंतरावर दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न केला. यात दोन दहशतवादी ठार झाले असून या हल्ल्यात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. सुभेदार राजेंद्र प्रसाद, रायफल मॅन मनोज कुमार आणि रायफल मॅन लक्ष्मन डी या लष्कराच्या तीन जवानांनी प्राणांचे बलिदान देत दहशतवाद्यांचा आत्मघाती हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला. अशी माहिती भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
काश्मीरमध्ये राजौरी शहरापासून २५ किमी अंतरावर भारतीय लष्कराचा एक तळ आहे. या तळावर दोन दहशतवाद्यांनी आत्मघातील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहेत. अजूनही लष्कराची कारवाई सुरू आहे, अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. काश्मीरच्या उरीमध्ये भारतीय लष्कराच्या तळावर आठ वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. अशाच प्रकारचा हल्ला राजौरीमध्ये करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता. पण हा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी उधळून लावला आहे. तसेच आत्मघाती हल्ल्यासाठी आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. पण या घटनेत लष्कराचे तीन जवान शहीद झाले आहे.
काश्मीरमध्ये २०१६ ला उरी येथील भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला होता. २०१६ मध्ये १८ सप्टेंबरला जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास हा हल्ला केला होता. भारत-पाकिस्तानमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारतीय सीमेत घुसखोरी करत दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. दहशतवाद्यांच्या या भीषण हल्ल्यात भारतीय लष्कराचे १९ जवान शहीद झाले होते. तर १९ ते ३० जवान जखमी झाले होते.