तिरुवनंतपूरम : मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमालच नंतर आता केरळमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव झाला आहे. केरळने बर्फ फ्लूची प्रकरणे समोर आल्यानंतर राज्यस्तरीय आपत्तीचा दर्जा देत असल्याची औपचारिक घोषणा केलीय. मध्य प्रदेशमधील मंदसौर आणि कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये कोंबड्यांचे मांस आणि अंड्यांची दुकान सध्या बंद ठेवण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ मंगळवारी केरळमधील कोट्टायम आणि अल्लपुझा या दोन जिल्ह्यांमध्ये दक्षतेचा इशारा राज्य सरकाने जारी केला आहे. हिमाचलमधील स्थलांतरित पक्षांचा मृत्यूही बर्ड फ्लूने झाल्याची माहिती समोर आल्यानंतर तिथेही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोट्टायम जिल्हा प्रशानाने दिलेल्या माहितीनुसार, नींदूरमधील एका बदकांच्या पोल्ट्रीमध्ये बर्फ फ्लूचा संसर्ग झालेले पक्षी आढळून आले आहेत. येथे १२०० हून अधिक बदकांचा मृत्यू झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलप्पुझा जिल्ह्यातील कुट्टानद येथील काही पोल्ट्री फार्ममध्येही बर्ड फ्लूची प्रकरण समोर आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात बर्फ फ्लू झालेले पक्षी आढळून आल्याने संसर्ग रोखण्यासाठी ४८ हजार पक्षी मारण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. केरळचे वन्यजीव मंत्री के. राजू यांनी राज्यात बर्फ फ्लूचा संसर्ग झालेले पक्षी आढळून आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आठ सॅम्पल्समध्ये विषाणू आढळल्याचे राजू यांनी म्हटले आहे. बर्ड फ्लू झालेले पक्षी आढळून आल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यातील पशुपालन विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.


