करोनाबाधितांचा मृत्यूदर घटला

- आरोग्य मंत्रालयाची माहिती : बरे होणार्‍यांची संख्याही वाढली

Story: नवी दिल्ली : |
17th October 2020, 12:57 am
करोनाबाधितांचा मृत्यूदर घटला
नवी दिल्ली : देशात प्रति १० लाख लोकसंख्येच्या मागे कोविड-१९ मुळे होण्यार्‍या मृत्यूंची संख्या ८१ इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे भारताचे नाव जगातील सर्वात कमी मृत्यूदर असणार्‍या देशांच्या यादीत नमूद झाले आहे. भारतात ४ ऑक्टोबरपासून दररोज कोविड-१९ संसर्गामुळे १००० हून कमी रुग्णांचा मृत्यू होत आहे. तर शुक्रवारी मृत्युदर १.५२ टक्के इतका आहे. हा दर २२ मार्चपासून आतापर्यंतचा सर्वात कमी दर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

 देशातील २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून हा टप्पा गाठण्यासाठी मदत मिळाली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशात कोविड-१९ मुळे होणार्‍या मृतांची संख्या सतत कमी होताना दिसत आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. देशातील १३ राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दर १० लाख लोकसंख्येवर मृत्यूचा आकडा राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. यात पद्दुचेरी (४०३), महाराष्ट्र (३३५), दिल्ली (३३५), कर्नाटक (१५२), तामिळनाडू (१३५), आणि पंजाब (१३१) या राज्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने फक्त आजाराच्या प्रकोपावर नियंत्रण आणण्यावर लक्ष केंद्रित केले असे नसून गंभीर रुग्णांची योग्य देखभाल आणि उपचार उपलब्ध करून संसर्ग रोखणे आणि जीवन वाचवणे यावर देखील लक्ष्य केंद्रित केले असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांमुळे देशभरात आरोग्य सुविधा मजबूत करण्यास मदत मिळाली असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले. 

* देशात शुक्रवारी देखील करोनाच्या नव्या रुग्णांच्या तुलनेच बरे होणार्‍या रुग्णांची संख्या अधिक आहे. 
* गेल्या २४ तासांमध्ये देशातील ७०,३३८ रुग्ण बरे झाले आहेत. तर २४ तासांत आढळलेल्या नव्या रुग्णांची संख्या ६३,३७१ इतकी आहे. 
* देशभराच आतापर्यंत ६४,५३,७७९ इतके रुग्ण बरे झाले आहेत. सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या संख्येच्या १०.९२ टक्के इतकी आहे. 
* बरे झालेल्या रुग्णांपैकी ७८ टक्के रुग्ण हे केवळ १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्र या प्रकरणात सर्वात वरच्या स्थानी आहे. येथे दिवसाला १३ हजारहून अधिक रुग्ण बरे झालेले आहेत.
हेही वाचा