आयएसएसएफ विश्वचषकात भारत पहिल्या स्थानावर


31st May 2019, 02:00 pm

नवी दिल्ली :भारताने आयएसएसएफ विश्वचषकाच्या इतिहासात आजपर्यंतची आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी करताना ५ सुवर्ण पदक पटकावले आहेत. भारताने जर्मनीच्या म्यु​निखमध्ये आयएसएसएफ विश्वचषकात (राफयल/ पिस्तुल) अखेरच्या दिवशी दोन मिश्र किताब जिंकून भारताच्या सुवर्ण पदकांची संख्या ५ केली.
अंजुम मुद्गिल व दिव्यांश सिंग पवारने १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्ण पटकावले तर मनू भाकर व सौरभ चौधरी या युवा जोडीने १० मीटर एअर पिस्तुल मिश्र सांघिकमध्ये सुर्व मिळवले. भारताने स्पर्धेत ५ सुवर्ण व १ रौप्य पदक कमावले आहे.
मिश्र एअर रायफल स्पर्धेत भारतीय जोड्यांमध्ये सामना झाला व अंजुम मुद्गिल व दिव्यांश सिंग पवारने अपूर्वी चंदेला व दीपक कुमार यांचा १६-२ने पराभव करत सुवर्ण जिंकले. या स्पर्धेत भारताला रौप्य पदकही मिळाले. एअर पिस्तुलमध्ये मनू भाकर व सौरभ चौधरी युवा जोडीने युक्रेनच्या जोडीचा १७-९ ने पराभव करून सुवर्ण पटकावले. भारताने गुणतक्त्यात पहिले स्थान मिळवले तर चीनने दोन सुवर्ण, दोन रौप्य व पाच कांस्य पदकांसह ९ पदक जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे.