असे का झाले हे समजू शकले नसल्याची सारवासारव मुख्याध्यापकांनी केली. मूल्यांकनात चूक झाली असावी, त्याची चौकशी केली जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.
बरवानी (म. प्रदेश) : मध्य प्रदेशातील एका शाळेचा बारावी बोर्डाचा निकाल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. एकीकडे देशातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचे मोठमोठे दावे केले जातात, मात्र बरवानी जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचा निकाल या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण करतो. येथे बारावीचा निकाल शून्य लागला. म्हणजे बारावीचे सर्व विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत नापास झाले.
ही सरकारी शाळा बरवानी जिल्ह्यातील मालफा गावात आहे. या शाळेतील ८५ मुलांनी १२ वीची परीक्षा दिली मात्र एकही पास होऊ शकला नाही. या शून्य निकालावर आश्चर्य व्यक्त करत शाळेच्या मुख्याध्यापकांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणार असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनीही त्याची दखल घेतली आहे. याची चौकशी करून दोषी शिक्षकांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.
बारावीच्या निराशाजनक निकालामुळे संतप्त झालेल्या पालकांनीही तडक शाळा गाठली. शाळा प्रशासन आणि शाळेच्या घसरलेल्या शैक्षणिक पातळीवर कडाडून टीका करण्यात आली. दरम्यान या गैरप्रकाराबाबत तक्रार करून शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
शैक्षणिक सोयीच्या नावाखाली येथे उच्च विद्यालयाची नवीन इमारतही तयार असल्याचे प्राध्यापक आणि शिक्षक मोठ्या गर्वाने सांगतात. मात्र तरीही निकाल शून्य लागला आहे. शाळेत अभ्यास होत नाही, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. यावेळी परीक्षा केंद्रावर कडक बंदोबस्त असल्याने कॉपीसारखे प्रकार झाले नाहीत, त्यामुळेच कदाचित सर्व विद्यार्थी नापास झाले असावे त्यांचे म्हणणे आहे.
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आलोक सिसोदिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, बारावीचा निकाल खराब लागला आहे, ही खरी गोष्ट आहे. पण असे का झाले ते समजत नाही. मूल्यांकनात चूक झाली, त्याची चौकशी केली जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे.ते म्हणाले की, यावर्षीच शाळेचा निकाल घसरला आहे. गेल्या वर्षीचा निकाल चांगला लागला होता . या शाळेतून दोन मुलांची एमबीबीएससाठी निवड झाली असून, येथून अनेक मुले उत्तीर्ण होऊन चांगल्या पदावर असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. या निकालामागचे कारण काहीही असले तरी त्याची चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. दोषी शिक्षकांवर कारवाई केली जाईल.