मडगाव : पर्वरीतील वाहतूक कोंडीवर सध्या कोणताही तोडगा उपलब्ध नाही, असे राज्य सरकारकडून दिले जाणारे उत्तर पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे, अशा शब्दांत गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारवर टीका केली. गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक नागरिकांना आणि प्रवाशांना दररोज तासन्तास वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत सरकारकडून या समस्येचा अभ्यास आणि विश्लेषण करण्यासाठी आणखी वेळ मागितला जात आहे. मात्र, त्रस्त नागरिकांना अभ्यासाचे अहवाल नको आहेत, तर तातडीने केलेली कृती आणि ठोस निकाल हवे आहेत, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
पर्वरीतील वाहतूक कोंडीवर अद्याप ठोस आणि प्रभावी उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. पर्वरीतील जनतेचा आणि प्रवाशांचा आणखी किती वेळ वाया घालवणार आहात, असा सवाल त्यांनी केला. पर्वरीकरांना दीर्घकाळापासून या समस्येचा नाहक त्रास सहन करावा लागत असून, आता केवळ पाहणी, अभ्यास आणि अहवालांच्या फेऱ्यांत वेळकाढूपणा करण्याची मुळीच गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पर्वरीचा सहापदरी एलिव्हेटेड कॉरिडोर या भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प म्हणून पुढे आणण्यात आला होता. मात्र, आता याच प्रकल्पाच्या नावाखाली पुन्हा नव्याने अभ्यास आणि अहवाल तयार करण्याच्या प्रक्रियेत वेळ घालवणे अयोग्य आहे. सरकारने विलंब न करता वाहतुकीची समस्या मुळापासून सोडवण्यासाठी उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
यासोबतच, वाहतूक कोंडी निर्माण करणारे प्रमुख अडथळे लवकरात लवकर दूर करण्यात यावेत, मार्गावरील प्रवेश व निर्गमन मार्गांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, सर्व्हिस रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती केली जावी आणि संपूर्ण वाहतूक व्यवस्थापनात योग्य ते बदल करण्यात यावेत, असेही त्यांनी नमूद केले. गोमंतकीय नागरिक, दैनंदिन प्रवासी आणि गोव्याच्या एकंदरीत हिताला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. पर्वरीतील जनतेने आतापर्यंत वाहतूक कोंडीचा खूप मोठा त्रास सहन केला असून, सरकारने आता कोणत्याही प्रकारची टोलवाटोलवी न करता तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन विजय सरदेसाई यांनी केले आहे.


