काठमांडू : नेपाळ-तिबेटमधील विनाशकारी महापुरानंतर २०५० पर्यंत हिमालयातील गंगा आणि ब्रह्मपुत्रा खोऱ्यातील हिमनद्या ३५ ते ४५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे भारतामधील अनेक राज्यांवर महापूर आणि त्यानंतर पाणीटंचाईचे मोठे संकट येऊ शकते. सध्या नेपाळ, तिबेटमधील विनाशकारी महापुरातील मृतांची संख्या ६१६ वर पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली. नेपाळच्या आपत्ती निवारण यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, देशातील किमान १,९२४ लोक अजून बेपत्ता आहेत.
हिमनद्या वितळल्यास भारतातील अनेक राज्यांना धोका
अहवालानुसार हिमनद्या वितळल्यास पुराचा धोका असलेल्या भारतील अनेक राज्यांचा समावेश आहे. त्यात उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यांचा समावेश आहे. ढगफुटी, भूस्खलन आणि हिमनद्यांची सरोवरे फुटल्याने (GLOF) उत्तराखंड व हिमाचल प्रदेश या राज्यांना धोका संभवतो.
हिमनद्या फुटल्याने मैदानी पट्ट्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्याने बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांत पूरस्थितीचा धोका आहे.तीस्ता आणि इतर नद्यांच्या खोऱ्यातील पाण्याच्या प्रवाहात वाढ होऊन सिक्कीम, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. ब्रम्हपुत्रा नदी खोऱ्यातील वाढत्या पाणीप्रवाहामुळे आसाम, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये महाप्रलयाचा धोका संभवतो.
महापूर नंतर पिण्याच्या, शेतीच्या पाण्याचा प्रश्न सतावणार
जागतिक तापमानवाढीमुळे हिमालयातील बर्फ वितळण्याचा वेग पूर्वीच्या तुलनेत खूप वाढला आहे. बर्फ वितळल्यामुळे डोंगराळ भागात हजारो नवी हिमनदीची सरोवरे तयार झाली आहेत. अतिवृष्टी, भूकंप किंवा हिमकडे तुटून पडून नद्यांना महापूर येऊ शकतात आणि दीर्घकाळात पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो.


