चुकीच्या आरोपामध्ये २० वर्षे सौदी जेलमध्ये काढल्यानंतर केरळचा 'तो' तरुण मायदेशी परतला

'नुकसान भरपाई'मुळे टळली फाशीची शिक्षा

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
6 hours ago
चुकीच्या आरोपामध्ये २० वर्षे सौदी जेलमध्ये काढल्यानंतर केरळचा 'तो' तरुण मायदेशी परतला

केरळ :  सौदी अरेबियातील एका प्रकरणात तब्बल २० वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर, भारतीय नागरिक अब्दुल रहिम अखेर आज मायदेशी परतला. एका अपघाती निधनामुळे फाशीची शिक्षा झालेल्या रहिमचा हा प्रवास अत्यंत संघर्षाने भरलेला राहिला.

केरळमधील कोझिकोड जिल्ह्यातील रामनट्टुकरा येथील रहिवासी असलेला अब्दुल रहिम २० वर्षांपूर्वी नोकरीसाठी सौदी अरेबियात गेला होता. तिथे एका १५ वर्षांच्या दिव्यांग सौदी मुलाच्या संगोपनाची जबाबदारी त्याच्यावर होती. मात्र, एका दुर्दैवी अपघातात त्या मुलाचा मृत्यू झाला आणि रहिमवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला. सौदीच्या न्यायालयाने या प्रकरणात रहिमला दोषी ठरवून थेट फाशीची शिक्षा सुनावली होती.

रहिमची फाशी टाळण्यासाठी सौदीच्या कायद्यानुसार पीडित कुटुंबाला 'ब्लड मनी' (आर्थिक नुकसानभरपाई) देणे आवश्यक होते. यासाठी सौदीमधील मल्याळी समुदाय आणि जगभरातील अनिवासी भारतीयांनी अभूतपूर्व ऐक्य दाखवले. मोठ्या प्रमाणावर राबवलेल्या क्राऊड फंडिंग मोहिमेद्वारे तब्बल १५ दशलक्ष सौदी रियाल म्हणजेच ३४ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारण्यात आला. ही रक्कम पीडित कुटुंबाला सुपूर्द केल्यानंतर रहिमची फाशीची शिक्षा माफ करण्यात आली. मात्र, सौदीच्या कायद्यानुसार त्याला २० वर्षांचा तुरुंगवास पूर्ण करावा लागला.

रियाधमधील भारतीय दूतावासाने रहिमच्या सुटकेची पुष्टी करत, त्याच्या संपूर्ण तुरुंगवासाच्या काळात सौदी प्रशासनाशी सतत पाठपुरावा केला असल्याचे सांगितले. दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अब्दुल रहिमच्या सुटकेसाठी सहकार्य केल्याबद्दल आम्ही सौदी प्रशासनाचे आभार मानतो. तसेच या कठीण काळात अढळ पाठिंबा, एकजूट आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास दाखवणाऱ्या संपूर्ण भारतीय समुदायाचे आम्ही ऋणी आहोत.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रहिम आपल्या वृद्ध आईला आणि कुटुंबाला भेटला. जागतिक पातळीवर भारतीय समुदायाच्या एकजुटीचे हे एक मोठे उदाहरण मानले जात आहे.

हेही वाचा