जय पवारांनी व्हिडिओ केला शेअर; केले 'हे' गंभीर आरोप!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला होता. आता या प्रकरणाला एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात 'व्हीएसआर व्हेंचर्स'चे मालक रोहित सिंग हे विमानाच्या मुख्य वैमानिकाच्या सीटवर झोपलेले दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या गंभीर निष्काळजीपणावर संताप व्यक्त करत जय पवार यांनी रोहित सिंग यांच्या अटकेची आणि संबंधित कंपनीची सर्व विमाने तातडीने ग्राउंडेड करण्याची मागणी केली आहे.
पहा व्हिडिओ.
२८ जानेवारी रोजी बारामती येथे अजित पवार आणि इतर चार जणांना घेऊन जाणाऱ्या 'लिअरजेट ४५' या विमानाला भीषण अपघात झाला होता. हे विमान 'व्हीएसआर व्हेंचर्स' या कंपनीमार्फत चालवले जात होते. या दुर्घटनेत अजित पवार यांचा मृत्यू झाला, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर जय पवार यांनी रविवारी एक व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध केली. या व्हिडिओमध्ये रोहित सिंग विमानाच्या कॉकपिटमध्ये निवांत झोपलेले दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना जय पवार यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली. "आम्ही आमचे वडील गमावले आहेत, हे दुःख आयुष्यभर आमच्यासोबत राहील. विमानाच्या मुख्य वैमानिकाच्या जागी कंपनीचा मालक अशा प्रकारे झोपलेला असणे हे अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे. हवेत असताना अशी निष्काळजीपणाची वागणूक कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

जय पवार यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (DGCA) या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत या संपूर्ण अपघाताचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत 'व्हीएसआर व्हेंचर्स'च्या सर्व विमानांचे उड्डाण थांबवावे आणि रोहित सिंग यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, असेही त्यांनी आपल्या आवाहनात नमूद केले आहे. "हा केवळ एका मुलाचा आक्रोश नसून, प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी केलेला हा सवाल आहे," अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली.

दरम्यान, 'एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो'ने (AAIB) या अपघाताचा प्राथमिक अहवाल शनिवारी प्रसिद्ध केला. या अहवालात अपघाताच्या वेळी दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) आवश्यक पातळीपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच बारामती विमानतळावरील धावपट्टीच्या खुणा अस्पष्ट असल्याचे आणि धावपट्टीवर खडी पसरलेली असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, जय पवार यांनी या अहवालावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा अहवाल अपूर्ण आणि तपशीलवार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील जनता आणि ज्या कुटुंबांनी आपले आप्त गमावले आहेत, त्यांना या अपघाताची पारदर्शक आणि सविस्तर माहिती मिळणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. केवळ काही विमानांवर कारवाई करण्याऐवजी संपूर्ण कंपनीच्या ताफ्याची चौकशी करून प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
