तेलाचे दरही पेटणार, शेअर बाजार गटांगळ्या खाणार, तर सोन्याचे दरही भडकण्याची शक्यता.

दुबई: इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे मध्यपूर्व आशियातील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली आहे. दुबईची जगप्रसिद्ध इमारत असलेल्या 'बुर्ज खलिफा'च्या परिसरात भीषण ड्रोन हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बुर्ज खलिफाची वीज खंडित करून इमारत रिकामी करण्यात आली. या घटनेनंतर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अल मकतूम विमानतळावरील सर्व उड्डाणे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. या युद्धाचा थेट परिणाम भारतासह जगभरातील विमान वाहतुकीवर झाला असून, एअर इंडियाने १ मार्च रोजीची लंडन, टोरंटो, पॅरिस, शिकागो आणि फ्रँकफर्ट यांसारख्या महत्त्वाच्या शहरांची उड्डाणे रद्द केली आहेत.

नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) भारतीय विमान कंपन्यांना ११ देशांच्या आकाशक्षेत्राचा (एअरस्पेस) वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे. अनेक देशांनी आपली एअरस्पेस तात्पुरती बंद केल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. एअर इंडियाचे एक विमान पाच तास हवेत राहिल्यानंतर सौदी अरेबियातून पुन्हा माघारी फिरवावे लागले. इंडिगोसह इतर कंपन्याही परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. प्रवाशांनी विमानतळावर गर्दी करू नये आणि आपल्या विमानाबाबतची ताजी माहिती विमान कंपन्यांकडूनच घ्यावी, अशी सूचना प्रशासनाने केली आहे.

मध्यपूर्वेतील या तणावामुळे तिथे वास्तव्यास असलेल्या हजारो भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इस्रायलमध्ये सुमारे ४० हजार भारतीय असून, त्यांना दूतावासात नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इराणमध्ये १० हजारांहून अधिक भारतीय असून, त्यात बहुतांश काश्मीरमधील वैद्यकीय विद्यार्थी आहेत. इराणमधील विद्यार्थ्यांनी व्हिडिओ संदेशांद्वारे मदतीची याचना केली आहे. ५ मार्च रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या वैद्यकीय परीक्षांमुळे हे विद्यार्थी तिथेच थांबले होते, मात्र आता युद्धाच्या भीषणतेमुळे त्यांची तातडीने सुटका करण्याची मागणी जोर धरत आहे.

दुसरीकडे, इराणने जगातील महत्त्वाचा तेल पुरवठा मार्ग असलेली 'होर्मुझची सामुद्रधुनी' बंद करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांना रेडिओ संदेशाद्वारे गंभीर इशारा दिला आहे. हा सागरी मार्ग बंद झाल्यास जगभरातील इंधन पुरवठ्यावर परिणाम होऊन कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडण्याची शक्यता आहे.

या युद्धाचे पडसाद जागतिक बाजारपेठेवरही उमटत आहेत. तज्ज्ञांच्या मते, सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळू शकते. सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांचा कल सोन्या-चांदीकडे वाढल्याने त्यांच्या किमतीत पुन्हा मोठी तेजी येण्याची शक्यता केडिया ॲडव्हायझरीसारख्या संस्थांनी वर्तवली आहे.