गाझामध्ये मदतीअभावी १४ हजार मुलांचा जीव धोक्यात

Story: विश्वरंग |
23rd May, 10:40 pm
गाझामध्ये मदतीअभावी १४ हजार मुलांचा जीव धोक्यात

संयुक्त राष्ट्रांचे मानवतावादी प्रमुख टॉम फ्लेचर यांनी गंभीर इशारा दिला आहे की, जर पुढील ४८ तासांत गाझा पट्टीमध्ये मदत पोहोचली नाही, तर सुमारे १४ हजार मुलांचा मृत्यू होऊ शकतो. टॉम फ्लेचर यांनी बीबीसीच्या एका कार्यक्रमात सांगितले की, इस्रायल गाझाला जाणारी मदत थांबवत आहे, ज्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संपूर्ण गाझा पट्टी ताब्यात घेण्याची शपथ घेतली आहे. गेल्या ११ आठवड्यांपासून इस्रायलने गाझाची पूर्णपणे नाकाबंदी केली आहे. त्यामुळे अन्न, पाणी आणि औषधे घेऊन जाणारे कोणतेही ट्रक गाझामध्ये येऊ शकले नाहीत. यामुळे गाझामध्ये उपासमारीसारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव वाढल्यानंतर, बेंजामिन नेतान्याहू यांनी अलीकडे गाझासाठी असलेल्या मदत ट्रकांवरील बंदी थोडी कमी करण्याची घोषणा केली. मात्र, ही मदत गरजेच्या तुलनेत खूपच कमी आहे. टॉम फ्लेचर यांनी सांगितले की, फक्त पाच मदत ट्रक गाझामध्ये गेले. ही मदत गाझाच्या लोकांच्या गरजेसाठी अजिबात पुरेशी नसल्याचे त्यांनी सांगितले. 

बीबीसीच्या वृत्तानुसार, लहान मुलांचे अन्न आणि पोषण सामग्री असलेले ट्रक तांत्रिकदृष्ट्या गाझामध्ये असले तरी, ते सीमेवरच थांबले आहेत आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेले नाहीत. गाझामध्ये इस्रायलच्या नाकेबंदीमुळे अन्नाची आणि औषधांची तीव्र कमतरता आहे. संयुक्त राष्ट्रांनी इशारा दिला आहे की, जर तातडीने मदत पोहोचली नाही, तर पुढील दोन दिवसांत हजारो मुलांचा मृत्यू होऊ शकतो. इस्रायलने मदतीवरील बंदी थोडी शिथिल केली असली तरी, ती गरज पूर्ण करण्यासाठी खूपच कमी आहे.

युनिसेफ आणि वर्ल्ड फूड प्रोग्रामने १२ मे रोजी इशारा दिला होता की, गाझातील सर्व रहिवासी अन्न असुरक्षिततेच्या संकटात आहेत आणि सप्टेंबर २०२५ पर्यंत ४.७ लाख लोक दुष्काळाच्या उंबरठ्यावर असतील. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, १४ हजार बालके पुढील ४८ तासांत अन्नाअभावी मृत्यूच्या दारात आहेत. अनेक ठिकाणी दवाखाने औषध आणि इंधनाअभावी बंद पडले असून, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेची व्यवस्थाही कोलमडली आहे.

या युद्धामुळे गाझामध्ये ८० ते ९० टक्के इमारती उद्ध्वस्त झाल्या, तर इस्रायलला आर्थिक आणि राजनैतिक नुकसान झाले आहे. आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असून, युद्धविरामाच्या चर्चा सुरू आहेत. परंतु, तणाव कायम आहे.

- सुदेश दळवी, गोवन वार्ता