हे तर तहान लागल्यानंतर विहीर खणण्यासारखे !

Story: अंतरंग - गोवा |
22nd May, 12:53 am
हे तर तहान लागल्यानंतर विहीर खणण्यासारखे !

मान्सूनपूर्व पावसाने राज्याला झोडपून काढले. रस्त्यांवर पाणी साचणे, झाडे पडणे, वीज पुरवठा खंडित होणे हे प्रकार सुरूच आहेत. नेमेचि येतो मग पावसाळा... अशी ही स्थिती आहे. राज्यात सरकार आहे, प्रशासन आहे, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आहे, तरीही पावसाळा आला की सर्व यंत्रणांची तारांबळ उडते. दरवर्षी पावसापूर्वी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या बैठका होतात. काही निर्णय घेतले जातात. काही निर्णयांची कार्यवाही होते. मात्र पावसामुळे उद्भवणारी स्थिती किंवा गैरसोयीत बदल होत नाही. आपत्ती व्यवस्थापनासाठीचे नियोजन योग्य प्रकारे होत नाही. घेतलेल्या निर्णयांची किंवा उपायांची कार्यवाही होत नाही. हे यामागील कारण आहे.

दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. त्यापूर्वी मेमध्ये मान्सूनपूर्व सरी कोसळतात. या सरीमुळे उकाडा दूर होतो. हवेत गारवा निर्माण होतो. हा पाऊस आल्हाददायक असला तरी त्यामुळे सर्वांचीच गैरसोय होते. पाणी साचून वाहतुकीची कोंडी होते. खंडित वीजपुरवठ्याबरोबर मोबाईल नेटवर्क सुद्धा बऱ्याच ठिकाणी ठप्प होते. 

पावसाळ्यापूर्वी पालिकांकडून गटार साफ करण्याचे काम केले जाते. वीज खात्याकडून वाहिन्यांजवळील झाडे कापण्यासह दुरुस्तीची कामे केली जातात. रस्त्याबाजूची धोकादायक झाडेही कापली जातात. रस्त्यांची डागडुजी केली जाते. ही कामे केव्हा व्हायला हवीत? मेच्या उत्तरार्धात बहुतांशी पाऊस पडतोच. यामुळे मेच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत तरी सर्व कामे पूर्ण व्हायला हवीत. मे संपत आला तरी ही कामे पूर्ण होत नाहीत. याला गलथानपणा म्हणणार नाही तर काय? पणजी महापालिकेतर्फे सध्या रस्त्याबाजूची झाडे कापण्याचे कामे सुरू आहेत. धोकादायक झाडांचा शोध घेऊन ती एप्रिलपर्यंत कापणे शक्य नव्हते का? वीज खात्यातर्फे पावसापूर्वीच्या कामांसाठी शटडाऊन केला जात आहे. पावसापूर्वीचे दुरुस्तीकाम सुरू असतानाच एका लाईनमनचा हकनाक बळी गेला. अपघात केव्हाही व कसाही घडू शकतो. तरी सुरक्षेचा विचार करून पाऊस पडण्यापूर्वी वीज खात्याने दुरुस्तीची कामे पूर्ण करायला हवी. रस्त्यांबाबत सुद्धा हीच स्थिती आहे. पाऊस पडला तरी रस्ते खणलेले असल्याने अपघात घडण्याची शक्यता बळावते. सांगायचे तात्पर्य म्हणजे, वीज दुरुस्ती कामे, रस्ते, धोकादायक झाडे हटविण्याची कामे करण्यासाठी पावसाची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. पावसाळ्यापूर्वीची कामे तसेच आपत्कालीन स्थितीसाठीचे नियोजन अगोदर व्हायला हवे. स्टीच इन टाईम सेव्हज नाईन... या वाक्यप्रचाराचे पालन सरकार तसेच प्रशासनाने करायला हवे.

- गणेश जावडेकर