यापेक्षा वाईट स्थिती पावसाचा हंगाम सुरू झाल्यानंतर येऊ नये यासाठी सर्व खात्यांनी आताच कामाला लागून पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्यापूर्वीच सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मान्सूनच्या आगमनापूर्वीच अवकाळी पावसाने गोव्यात बऱ्याच भागात नुकसान केले. मान्सूनपूर्व खबरदारीची कामे सुरू असताना, रस्त्यांचे डांबरीकरण अंतिम टप्प्यात असताना आणि पालिका, पंचायत, वीज खात्यांकडून मान्सूनपूर्व साफसफाई तसेच तयारीची कामे सुरू असताना अचानक पावसाने जोर धरल्यामुळे गोव्यातील जनजीवन विस्कळीत झाले. काही भागात वादळी वाऱ्याचा फटका तर काही भागात दरडी कोसळल्यामुळे आणि पूरसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे लोकांना फटका बसला. बार्देश तालुक्यात अनेक भागातील घरांमध्ये पाणी शिरले. डिचोली, मडगाव, वास्कोत रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला. सत्तरीसारख्या भागात झाडे कोसळल्यामुळे घरांचे नुकसान झाले. राज्यभर पावसाने थैमान घातल्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा फटका बसला. प्रशासकीय स्तरावरील मान्सूनपूर्व कामे वेळेत न झाल्यामुळे अनेक भागात पूरसदृश स्थिती उद्भवली. पणजीवगळता राज्याच्या अन्य भागात अनेक समस्या यामुळे निर्माण झाल्या. पुढील काही दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केल्यामुळे पावसापूर्वीच्या पावसाला लागूनच गोव्यात मान्सूनचेही आगमन होऊ शकते. गेल्या काही वर्षांत गोव्यात अचानक पाऊस येत असतो. किनारी भाग असल्यामुळे देशातील काही राज्यांना अवकाळी पावसाचा फटका बसत असतो, त्यात गोवाही येतो. त्यामुळे गोव्यातील परिस्थिती पाहून मान्सूनपूर्व जी तयारी किंवा कामे करायची असतात ती मे महिन्याच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत संपुष्टात येतील अशा प्रकारे त्याचे नियोजन करावे लागेल. कारण अनेक भागात गटारे साफ करण्याची कामे अद्याप व्हायची आहेत. रस्ते हॉटमिक्स करण्याचे काम सुरू आहे. वीज वाहिन्या, ट्रान्सफॉर्मर्स, वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या हटविण्याचे काम सुरू होते. सर्व खात्यांनी आपली कामे हाती घेतली असताना पावसाने राज्याला तडाखा दिला. यापूर्वीही असेच प्रसंग गोव्यात अनेकदा उद्भवले आहेत. सध्या तर पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या हस्तक्षेपाची स्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेतली होती. पण ती यंत्रणा इतक्या लवकर सक्रिय करण्याची वेळ येईल, असे त्यांनाही वाटले नसावे. पावसामुळे सध्या ही यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. पावसाचा पुढील दोन दिवस जोर असेल आणि अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेली वादळाची स्थिती निवळली नाही तर कदाचित पावसाचा अजूनही गोव्याला फटका बसू शकतो.
गेले दोन दिवस पडत असलेल्या संततधार पावसाचा जास्त फटका सत्तरी, डिचोली, बार्देश आणि पेडणे तालुक्यांना बसला आहे. इतर तालुक्यांमध्ये, मुख्य शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत सर्वांनाच या पावसाचा तडाखा बसलेला आहे. पावसाला कोणी रोखू शकत नसला तरी मान्सूनपूर्व कामे पूर्ण होण्यापूर्वीच पाऊस कोसळत असल्यामुळे सर्वत्र दाणादाण उडाली. पेडणे, सत्तरी, काणकोण, डिचोली भागात अनेक ठिकाणी घरांवर तसेच रस्त्यांवर झाडे कोसळण्याचे प्रकार घडले. पेडणेतील मांद्रे येथे रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे एकाचा बळीही गेला. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेली धोकादायक झाडे कापण्याची अत्यंत गरज आहे. गेल्या वर्षी पणजीत झाड कोसळून एका मुलीचा मृत्यू झाला होता. दरवर्षी अशा काहीतरी घटना घडत असतात. पण तोपर्यंत अशी धोकादायक झाडे हेरून ती हटवण्याची तसदी घेतली जात नाही. पालिका, पंचायतींनी आपल्या परिसरातील अशी धोकादायक झाडे हटविण्यावर भर द्यायला हवा. कमकुवत असलेले विजेचे शेकडो खांब दरवर्षी पावसाळ्यात कोसळत असतात. त्यातूनही दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे मान्सूनपूर्व कामाच्या वेळी धोकादायक झाडे कापण्यासह, कमकुवत असलेले विजेचे खांब हटवून त्या जागी नवे खांब बसवण्याची गरज आहे. यावेळी सर्व खात्यांची मान्सूनपूर्व कामे सुरू असताना किंवा काही कामे सुरू होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावल्यामुळे त्रुटी शोधून त्या दूर करण्याची संधीही वेगवेगळ्या खात्यांना आहे. यापेक्षा वाईट स्थिती पावसाचा हंगाम सुरू झाल्यानंतर येऊ नये यासाठी सर्व खात्यांनी आताच कामाला लागून पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्यापूर्वीच सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.