वीज वाहिन्यांवर दुरुस्तीच्या कामावेळी सुरक्षेचे उपाय न करता काम करण्यासाठी जाणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना रोखण्यासह त्यांच्यावर योग्य कारवाई करावी लागेल. सुरक्षेसाठी ज्या गोष्टी पुरवल्या आहेत, त्यांचा वापर केल्याशिवाय वीज कर्मचाऱ्याने काम करू नये.
गोव्यात दरवर्षी लाईनमन, वायरमनचा विजेचा धक्का लागून मत्यू होण्याची घटना घडते. त्या घटनेनंतर वीज खाते सतर्क होते. त्यापूर्वी सगळा व्यवहार रामभरोसे सोडलेला असतो. जे काम लाईनमनने करायचे असते, ते लाईन हेल्परकडून करून घेतले जायचे आणि योग्य प्रशिक्षण नसलेले किंवा अनुभव नसलेले अनेक हेल्पर यापूर्वी विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडलेले आहेत. वीज खात्याने लाईनमनना तंबी दिल्यानंतर हल्ली लाईनमन विजेच्या खांबांवर कामासाठी जातात. होंडा येथे चंद्रू गावकर या सहाय्यक लाईनमनचा मृत्यू झाल्याने वीज खाते पुन्हा एकदा वादात सापडले आहे. वीज खात्याकडून सुरक्षेसाठी लागणारी उपकरणे किंवा अन्य साहित्य दिले जाते तरीही त्याचा वापर होत नाही, अशीही एक बाजू समोर आली आहे. वीज खाते सुरक्षेसाठी जे साहित्य पुरवते, त्याचा वापर होत नसेल तर हा मुद्दाही गंभीर आहे. वीज कर्मचारी आपली सुरक्षा पाहत नसतील तर अशा कर्मचाऱ्यांवर सक्तीचे सुरक्षात्मक उपाय करण्यासाठी दबाव यायला हवा. त्यासाठी त्या विभागाच्या अभियंत्यांनी वेळोवेळी आपल्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. गोव्यात वीज कर्मचाऱ्यांचे होत असलेले मृत्यू हे एक विदारक सत्य आहे. हे मृत्यू रोखण्यासाठी वीज खात्याने पाऊल उचलण्याची गरज आहे.
गेल्या काही वर्षांतील घटनांचा आढावा घेतला असता, वीज कर्मचाऱ्यांचे २०२३ मध्ये सर्वाधिक मृत्यू नोंद झाले आहेत. विशेष म्हणजे त्या वर्षी पाच लाईन हेल्परचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. गेल्या सात वर्षांत दहा लाईन हेल्परचे मृत्यू झाले आहेत. वीज वाहिन्यांची, वीज खांबांवरील कामाची जबाबदारी लाईनमनची असते. पण हेल्परना त्यासाठी कामाला पाठवले जाते आणि ते अनुभव, प्रशिक्षणाच्या अभावी जीव गमावून बसतात. ही बाब समोर आल्यानंतर वीज खात्याने लाईनमनना ताकीद दिली. आता सहाय्यक लाईनमन हे काम करताना बळी जात आहेत. वीज खात्याकडून गेल्या दोन तीन वर्षांमध्ये वीज कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत बदल करून तत्काळ मदतीसाठी ७ लाख रुपये, तर नुकसानभरपाई म्हणून २० लाख रुपये दिले जातात. कुटुंबातील एकाला नोकरीही दिली जाते. पण ही दुर्दैवी वेळ मात्र कुठल्याच वीज कर्मचाऱ्याच्या कुटुंबांवर येऊ नये. त्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल, त्याकडे वीज खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
वीज वाहिन्यांवर दुरुस्तीच्या कामावेळी सुरक्षेचे उपाय न करता काम करण्यासाठी जाणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना रोखण्यासह त्यांच्यावर योग्य कारवाई करावी लागेल. सुरक्षेसाठी ज्या गोष्टी पुरवल्या आहेत, त्यांचा वापर केल्याशिवाय वीज कर्मचाऱ्याने काम करू नये. सुरक्षेच्या उपायांकडे हलगर्जीपणा केल्यामुळेच अनेक लाईनमन, लाईन हेल्परचा जीव जातो. अनेकदा वीज खात्याचे कर्मचारी वीज पुरवठा बंद न करता दुरुस्तीकाम करण्यासाठी जातात. वीज पुरवठा बंद करण्यासह तो दुरुस्तीनंतरच सुरू होईल यासाठी वीज खात्याने खबरदारीचे उपाय करावे लागतील. मध्यंतरी डिचोलीत एका लाईनमनचा मृत्यू झाला होता, त्यावेळी त्या वीज वाहिनीला जोडून असलेल्या एका ठिकाणी इन्व्हर्टर सुरू झाल्यामुळे दुर्घटना घडल्याचे समोर आले होते. त्यानंतर इन्व्हर्टर नोंदणी सक्तीची झाली होती. वीज खात्याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठीच विशेष जागृती मोहीम राबवून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासह त्यांना सुरक्षात्मक उपाय घेतल्याशिवाय काम न करण्याचा सल्ला द्यायला हवा. नव्या कर्मचाऱ्यांना ज्यांना कामाचा अनुभव नाही अशा कर्मचाऱ्यांना काम देणे, आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांना दुरुस्तीची कामे देणे, हेल्परला लाईनमनचे काम करायला लावणे असे प्रकार टाळण्याची गरज आहे. यात सर्वांत धोकादायक दोन बाबी आहेत. एक वायरमन, लाईनमनचे काम हेल्परला करायला लावणे आणि दुसरे म्हणजे वीज पुरवठा बंद न करता दुरुस्तीचे काम करण्यासाठी पुढे सरसावणे. कामातील या हलगर्जीपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. आता वीज खात्यानेच कर्मचाऱ्यांना सुरक्षात्मक उपकरणे वापरण्यासाठी सक्ती करणे आवश्यक आहे. दुरुस्तीचे काम करणाऱ्या वीज कर्मचाऱ्याने हेल्मेट, इन्सुलेटेड ग्लोव्हज, पायातील बुट, सेफ्टी बेल्ट आणि खात्याने दिलेली इतर उपकरणे वापरण्याची सक्तीच करावी लागेल. दुरुस्तीच्या वेळी त्या भागातील वीज पुरवठा पूर्ण बंद करतानाच तो काम पूर्ण होईपर्यंत कोणी सुरू करणार नाही, याची योग्य दक्षता घेणेही तितकेच गरजेचे आहे. सरकारने वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करावा, तरच या दुर्घटना टळू शकतात.