ताळगावचे पाणी

सांडपाणी पिण्याच्या पाण्यामधून घरोघरी येऊ लागले, त्यानंतर दीड महिना सगळी खाती कुठून सांडपाणी आले आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये झिरपले तेच शोधत आहेत. प्रशासनाने ताळगावला लवकर या संकटातून मुक्त करावे आणि ज्यांच्यामुळे हा सारा प्रकार घडला आहे, त्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

Story: संपादकीय |
15th May, 10:47 pm
ताळगावचे पाणी

स्मार्ट शहर म्हणून ज्याची नवी ओळख होत आहे, त्याच्या शेजारचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ताळगाव हे गाव. त्याची हद्द पणजी शहराच्या वर्दळीच्या भागात सुरू होते. एका बाजूला दोनापावला दुसऱ्या बाजूला सांताक्रुज आणि इतर दोन बाजूंनी पणजी शहराचा मिरामार, सांतिनेज भाग. पणजी महापालिकेचे महापौर हे ताळगावचे. स्मार्ट सिटीचे सदस्य आणि महसूल मंत्री हेही ताळगावचे. जेनिफर मोन्सेरात ताळगावच्या आमदार. मंत्री, आमदार आणि महापौर पती, पत्नी आणि पुत्र. अर्थात एक कुटुंब. त्यांच्या या ताळगावात सध्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. ताळगावात अनेक ठिकाणी पूर्वी विहिरी होत्या. त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्याही बुजवल्या गेल्या किंवा त्यांची स्वच्छता केली गेली नाही. त्यामुळे ताळगाव सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे.

पिण्याचे पाणी टँकरने येतेच, पण त्याहीपेक्षा ताळगावला सध्या एका मोठ्या समस्येने ग्रासले आहे. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये शौचालयाचे अर्थात सांडपाणी गेल्यामुळे गेले काही दिवस या भागातील पाणी पुरवठा खंडित आहे. ताळगावमध्ये सुमारे पन्नास दिवस ही स्थिती आहे. एक दिवस पाण्याशिवाय काढणे कठीण असताना ताळगावमधील मोठा भाग सध्या टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवत आहे. व्हडले भाट ते बोरभाटपर्यंतच्या भागात सध्या ही समस्या आहे. पिण्याच्या पाण्यात सांडपाणी गेल्यामुळे नेमका हा प्रकार कुठे आणि कसा घडला, ते शोधण्यात अद्यापही सार्वजनिक बांधकाम खात्याला यश आलेले नाही. सार्वजनिक बांधकाम खाते, आरोग्य खाते आणि स्थानिक पंचायतीने या पाईपलाईनचे निरीक्षणही केले. या भागात अनेक इमारती, घरे आहेत त्यातील नेमके कुठे सांडपाणी भरून बाहेर वाहू लागले त्याची माहिती मिळालेली नाही. अनेकजण शौचालयाचे सोकपीट वेळोवेळी रिकामे करत नाहीत. त्यामुळे या भागातील सांडपाण्याच्या टाक्यांमधून घाण बाहेर आलेली असू शकते, जी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये घुसल्याची शक्यता आहे. त्यामुळेच दूषित पाणी अनेक नळांमधून येऊ लागले. ताळगावातील व्हडले भाट ते बोरभाट या भागातील नागरिकांना सध्या याचा त्रास सहन करावा लागत आहे. सरकारनेही या भागातील लोकांना टँकरने पाणी पुरवठा केलेला नाही. लोक आपल्या पैशाने टँकर मागवतात. सध्या आरोग्य खात्याने काहीजणांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असल्या तरी अद्यापही कोणाच्या सांडपाण्याच्या टाक्यांमुळे हा प्रकार घडला, त्याची माहिती समोर आलेली नाही. पंचायत कुठलीच जबाबदारी घेत नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याला कुठे सांडपाणी झिरपून ते पिण्याच्या पाईपलाईनमध्ये जाते ते सापडलेले नाही. व्हडले भाट, बोरभाटनंतर नागाळी परिसरात लोकांना दूषित पाणी पुरवठा होत आहे अशा तक्रारी आहेत.

विशेष म्हणजे ताळगावला हल्लीच शहरी दर्जा दिला होता. महसूल खात्याने सीआरझेड आणि निधीसाठी ताळगावला 'अर्बन'चा दर्जा दिला आहे. ताळगावची परिस्थिती मात्र शहरी दर्जाची नाही. शेतांमध्ये भराव घालून इमारती उभारणे, कुठलेच नियोजन नसताना मिळेल त्या पद्धतीने प्रकल्पांना मान्यता देणे हे ताळगावमध्ये नेहमीच पहायला मिळते. आजही शेतांमध्ये अनेक गृह प्रकल्प उभे राहत आहेत. ताळगावच्या क्षमतेपेक्षा जास्त बांधकामे तिथे आलेली आहेत. शेतांमध्ये इमारती, मोठे गृह प्रकल्प आणि रस्तेही आले. ताळगावचे वैभव कधीच नष्ट झालेले आहे, त्यामुळेच वेगवेगळ्या समस्या ताळगावमध्ये निर्माण होत आहेत. सध्या अनेक घरे, इमारतींमधून सांडपाणी गटारात सोडले जाते ज्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. आता जी स्थिती उद्भवलेली आहे त्यात पिण्याच्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी झिरपण्याची घटना जरी व्हडले भाट ते बोरभाट दरम्यान घडलेली असली तरी सांडपाणी गटारात सोडण्याचे प्रकार अनेक ठिकाणी होतात. सध्याच्या घटनेनंतर व्हडले भाट ते बोरभाट या भागात दहा घरांमधून सांडपाणी गटारात सोडले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन वाड्यांवर ही स्थिती असेल तर संपूर्ण ताळगावमध्ये काय स्थिती असेल, ते लक्षात येईल. सांडपाणी पिण्याच्या पाण्यामधून घरोघरी येऊ लागले, त्यानंतर दीड महिना सगळी खाती कुठून सांडपाणी आले आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये झिरपले तेच शोधत आहेत. प्रशासनाने ताळगावला लवकर या संकटातून मुक्त करावे आणि ज्यांच्यामुळे हा सारा प्रकार घडला आहे, त्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.