गेल्या वर्षी लडाखमध्ये हिमस्खलनामुळे ३ जवानांचे मृतदेह बर्फाखाली गाडले गेले होते. भारतीय लष्कराने विशेष ऑपरेशन राबवून हे तीन मृतदेह शोधून काढले आहेत.
लेह : गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लडाखमध्ये हिमस्खलनात ३८ भारतीय जवान अडकले होते. या दुर्घटनेनंतर लष्कराने केलेल्या तातडीने राबवलेल्या बचाव मोहिमेच्या कारवाईत अनेक जवानांचे प्राण वाचले. या घटनेत एका जवानाचा मृतदेह सापडला होता, मात्र इतर तीन जवानांचा शोध लागला नाही. आता या घटनेच्या तब्बल ९ महिन्यांनंतर या ३ जवानांचे मृतदेह सापडले आहेत. हवालदार रोहित, हवालदार ठाकूर बहादूर आले आणि नाईक गौतम राजवंशी अशी त्यांची नावे आहेत. तिन्ही जवानांचे मृतदेह बर्फाच्या खोल दरीत गाडले गेले होते.
हिमस्खलनाच्या घटनेच्या वेळी बेपत्ता झालेल्या तीन जवानांचा शोध घेण्यासाठी विशेष मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले होते. मात्र नंतर ही मोहीम यशस्वी होऊ शकली नाही. या लष्करी मोहिमेचे नेतृत्व हाय अल्टिट्यूड वॉरफेअर स्कूलचे कमांडंट ब्रिगेडियर एसएस शेखावत यांनी केले. या मिशनमध्ये सहभागी असलेल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या मते, हे ऑपरेशन त्यांच्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक मिशन होते. लष्करी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे १८,७०० फूट उंचीवर ९ दिवस अत्यंत कठीण परिस्थितीत १० ते १२ तास सतत उत्खनन करण्यात आले.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मोहिमेसाठी तब्बल २०-३० टन बर्फाचे उत्खनन केले गेले आणि या काळात कठीण हवामान शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक होते. अनेक अडचणी असतानाही लष्कराला आपल्या मोहिमेत यश आले आणि बेपत्ता झालेल्या तीन जवानांचे मृतदेह सापडले. तीन जवानांपैकी एकाचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. किन्नौर जिल्ह्यातील शहीद सैनिक रोहित यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी तरंडा येथे आणण्यात आले आणि तेथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. उर्वरित दोन जवानांचे मृतदेहही पूर्ण सन्मानाने त्यांच्या घरी पाठवले जात आहेत.