नैनितालची जंगले ३६ तासांपासून जळत असून आतापर्यंत अनेक हेक्टर जंगले जळून राख झाली आहेत. जंगलातील आग रोखण्यासाठी वनविभागाने भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कराची मदत मागितली आहे.
नैनिताल: उन्हाळ्यात जंगलात आग लागण्याच्या घटना घडतात. वारा वाहत असताना अनेकदा झाडांचे कोरडे खोड एकमेकांवर घासतात आणि त्यामुळे आग लागते. मात्र, शुक्रवारी रुद्रप्रयागमध्ये जंगलाला आग लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. यातील एका तरुणाने मेंढ्या चरण्यासाठी गवताची गरज असल्याने त्याने जंगलाला आग लावली असल्याचे चौकशीदरम्यान सांगितले.
नैनितालच्या जंगलात लागलेली आग विझवण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. शनिवारी या हेलिकॉप्टरने भीमताल तलावातून पाणी भरले असून त्याच्या मदतीने जंगलातील आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नैनितालच्या जंगलात लागलेल्या आगीला ३६ तास उलटून गेले आहेत, मात्र अद्यापही वनविभागाला त्यावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. यासाठी वनविभागाने भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाची मदत मागितली आहे. या आगीने आतापर्यंत नैनितालमधील अनेक हेक्टरवर पसरलेले जंगल जळून राख झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जंगलातील आग आता वस्तीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कराची मदत घेतली जात आहे. नैनी तलावात बोटिंगला बंदी घालण्यात आली आहे. नैनिताल विभागाचे वन अधिकारी चंद्रशेखर जोशी यांनी सांगितले की, आग विझवण्यासाठी मोर्णा रेंजमधील ४० कर्मचारी आणि दोन वन परिक्षक तैनात करण्यात आले आहेत.
नैनिताल भावली रोडवरील पाइन जंगलात लागलेल्या आगीमुळे संपूर्ण रस्ता धुराने व्यापला आहे. आयटीआय इमारतीलाही आग लागली आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या २४ तासांत आगीच्या ३१ नवीन घटना समोर आल्या आहेत. ३३.३४ हेक्टर जंगले जळून खाक झाली आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या आणि सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच त्यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांना समन्वय राखण्यास सांगितले आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून उत्तराखंडमध्ये आगीच्या ५७५ घटना घडल्या आहेत. त्यामुळे ५८९.८९ हेक्टर वनक्षेत्र बाधित झाले आहे.