पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या अहवालात,भारतातील हिंदूंची लोकसंख्या कमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या अहवालाचा उद्देश देशाच्या लोकसंख्येतील बदलांचा लोकशाही प्रक्रिया आणि प्रशासनावर होणाऱ्या परिणामांचे मूल्यांकन करणे हा आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधानांना सल्ला देणाऱ्या आर्थिक सल्लागार समितीने अत्यंत महत्त्वाची आकडेवारी जाहीर केली आहे. कौन्सिलने जारी केलेल्या अधिकृत अहवालानुसार भारतात १९५० पासून हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये मोठी घट झाली आहे. त्याचबरोबर मुस्लिमांच्या लोकसंख्येचा आलेख झपाट्याने वाढला आहे. बहुसंख्यांकांच्या लोकसंख्येतील घट ही नेपाळ आणि म्यानमारमध्येही दिसून आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, ३८ इस्लामिक देशांमध्ये मुस्लिम लोकसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
आर्थिक सल्लागार समितीच्या अहवालानुसार, १९५० ते २०१५ दरम्यान भारतातील हिंदूंची लोकसंख्या ७.८२ टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याच काळात याच काळात मुस्लिमांच्या लोकसंख्येमध्ये ४३.१५ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर १९५१ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार भारतात हिंदूंची संख्या ८४.१० टक्के होती. मात्र, २०१५ मध्ये हिंदूंचा वाटा ७७.५२ टक्क्यांवर आला. या काळात हिंदूंची लोकसंख्या ७.८२ टक्क्यांनी घटली. त्याच वेळी, १९५१ मध्ये भारतात मुस्लिमांची संख्या ९.८० टक्के होती. २०१५ मध्ये ही संख्या १४.०२ टक्क्यांपर्यंत वाढली. १९५१-२०१५ दरम्यान मुस्लिम लोकसंख्येमध्ये ४३.१५ टक्के अशी लक्षणीय वाढ झाली आहे.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या अहवालावरून असे दिसून आले आहे की भारतातील अल्पसंख्याक सुरक्षित आहेत आणि त्यांची आर्थिक दृष्ट्यादेखील भरभराट होत आहे. भारतात केवळ मुस्लिमच नाही तर शीख आणि ख्रिश्चन धर्मीयांचीही लोकसंख्या वाढली आहे. अहवालानुसार, देशातील शीख लोकसंख्या ६.५८ टक्क्यांनी वाढली असून ख्रिश्चनांची लोकसंख्या ५.३८ टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, देशात पारशी आणि जैन धर्माच्या लोकांची संख्या कमी झाली आहे.
मुस्लिम बहुल देशात लोकसंख्येतील बदलाचा ट्रेंड किंचित वेगळा आहे. प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ३८ मुस्लिम बहुल देशांमध्ये मुस्लिमांचा वाटा वाढला आहे. १९५०मध्ये पाकिस्तानात मुस्लिमांची संख्या ७७.४५ टक्के होती. आता शेजारील देशात मुस्लिमांची संख्या ८०.३६ टक्के आहे. या काळात बांगलादेशातील मुस्लिमांची संख्या ७४.२४ टक्क्यांवरून ८८.०२ टक्के झाली. अफगाणिस्तानमधील मुस्लिम लोकसंख्या ८८.७५ टक्क्यांवरून ८९.०१ टक्के झाली आहे. मात्र मालदीवमधील मुस्लिमांची संख्या ९९.३६ टक्क्यांवरून ९८.३६ टक्क्यांवर घसरली आहे.
या अहवालात म्यानमारमधील बौद्धांची लोकसंख्या ७८.५४ टक्क्यांवरून ७०.८० टक्के, श्रीलंकेतील बौद्धांची लोकसंख्या ६४.२८ टक्क्यांवरून ६७.६५ टक्के आणि भूतानमधील बौद्धांची लोकसंख्या ७१.४४ टक्क्यांवरून ८४.०७ टक्क्यांवर गेली आहे. मात्र, दुसरीकडे नेपाळमध्ये हिंदूंची लोकसंख्या ८४.३० टक्क्यांवरून ८१.२६ टक्क्यांवर आली आहे.