लोकांसाठी गुन्हे अंगावर घेतलेल्या उमेदवाराचा अभिमान : अमित पाटकर
मडगाव : राज्यातील जंगल, नद्या, किनारीभाग राखण्यासाठी, शेतजमिनी व पर्यावरण राखण्यासाठी कॅ. विरियातो पुढे आलेले असताना त्यांच्यावर सरकारकडून गुन्हा नोंद करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यांच्यावरील गुन्हा सार्वजनिक केलेला आहे व ही जाहिरात पाहून दक्षिण गोव्यातील लोकांना याचा अभिमान असेल, कारण ही गुन्हा लोकांसाठी त्यांनी अंगावर घेतलेला आहे. त्यामुळे दक्षिण गोव्यातील लोक त्यांच्यासोबत राहतील, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकांतील दक्षिण गोव्यातील काँग्रेस उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी रामनवमीदिनाचे औचित्य साधत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन चंद्रू ए. (आयएएस) यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमा, गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई, आमदार कॅ. व्हेंझी व्हिएगस उपस्थित होते. अर्ज सादर करण्यापूर्वी कॅ. विरियातो यांनी फातोर्डा येथील दामोदर देवस्थानात जात व कपेलमध्ये प्रार्थना करत आशीर्वाद घेतले. यानंतर काँग्रेस कार्यालयानजीक काँग्रेससह इंडि आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले की, राज्यातील रेल्वे दुपरीकरणाचा विरोध करताना, लढा देताना हा खटला त्यांच्याविरोधात असल्याने याचा आम्हाला अभिमान आहे, की गोवा राखण्यासाठी झगडणाऱ्या कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्यावर राज्य सरकारने खटला दाखल केला. लोकांसाठी झगडणारा उमेदवार आघाडीकडून देण्यात आला, याचा अभिमान असून दक्षिण गोव्यातील लोकांनाही हा अभिमान असावा, असे पाटकर म्हणाले.
रामनवमीच्या दिवशी आघाडीचे दोन्ही उमेदवार उमेदवारी अर्ज सादर करणार.गोवा सांभाळण्यासाठी राज्यातील काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, शिवसेना, आप, तृणमूल काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असे सर्व पक्ष एकत्र आलेत. आम्हाला इव्हेंट मॅनेजमेंट किंवा पैसे जास्त खर्च करता येणार नाहीत, पण लोकांची साथ आहे. ही निवडणूक मनी पॉवर विरोधात पिपल्स पॉवर अशी आहे. हा जोश असाच कायम राहील, असे सांगतानाच युरी आलेमाव यांनी हाउ इज द जोश अशा घोषणा दिल्या व लोकांनी त्याला प्रतिसाद दिला.
गोव्यातील बेरोजगारी ही देशात सर्वात जास्त आहे व पल्लवी धेंपो यांनीही लोकांनी बेरोजगारी, महिला सक्षमीकरणाबाबत प्रश्न केल्याचे सांगत राज्य सरकार नोकऱ्या देण्यात अपयशी ठरल्याचे स्पष्ट केलेले आहे. राज्य सरकार नोकऱ्या विकत असल्याने स्थानिकांना रोजगार मिळत नाही. लोकांचे जगणे सुसह्य करण्यासाठी, पर्यावरण, गोवा राखण्यासाठी झगडणाऱ्या उमेदवाराच्या पाठिशी रामाचे आशीर्वाद असतील व लोकांनीही त्यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन विजय सरदेसाईंनी केले. ते ड्युप्लिकेट रामभक्त तर आम्ही ओरिजिनल रामभक्त असून आता रामनवमीदिवशी उमेदवारी अर्ज सादर करत आहोत.
आमदाम व्हेंझी व्हिएगस यांनी सांगितले की, भाजपसोबत फिरणारे कार्यकर्त्यांनाही सिलिंडर, वाढलेले इंधनाचा विषय सतावत आहेत. पाण्याचे, विजेची बिले पाहताच त्यांनाही जास्त वाटत आहेत. राज्यातील सर्व पक्ष एकत्र आल्याने भाजप घाबरलेले असल्याने अनेक राष्ट्रीय नेते गोव्यात येत आहेत. लोकांनी भाजपच्या धमक्यांना घाबरण्याची गरज नाही, मतदानातून जनशक्तीची ताकद दाखवा.
सरकारकडून गोवा सांभाळण्यासाठी झगडणारे कार्यकर्ते, संस्था, लोकांवर गुन्हे नोंद केले जातात, मायनिंग बंद करत अनेकांना उघड्यावर सोडले, शेतकऱ्यांची फसवणूक केली, युवकांना रोजगार नाही, महिलांवर अत्याचार होत आहेत. ही उमेदवारी केवळ आपली नाही तर सरकारमुळे अडचणीत असलेल्या सर्व सर्वसामान्य लोकांची आहे. ही लढाई गोव्यातून दिल्लीपर्यंत नेणार, असे मत कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी व्यक्त केले.