नवी दिल्ली : मद्रास उच्च न्यायालयाने एका प्रकरणात सुनावणी करताना तामिळनाडूतील सर्वच मंदिरांत मोबाइल वापरण्यास बंदी घालण्याचा निर्णय दिला आहे. हा निर्णय मंदिरांची शुद्धता व पावित्र्य जपण्यासाठी घेण्यात आला आहे. भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मंदिरांत फोन डिपॉझिट करण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था केली जावी. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मंदिरात सुरक्षारक्षकही तैनात केले जातील, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मोबाइलमुळे भाविकांचे लक्ष्य विचलित होते
उच्च न्यायालयाने हा आदेश एका याचिकेवर सुनावणी करताना दिला आहे. या याचिकेत सुब्रमण्यम स्वामी मंदिरात मोबाइलवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मोबाइलमुळे भाविकांचे लक्ष्य विचलित होते. मंदिरात देवांचे फोटो काढणेही परंपरेच्या विरोधात आहे, असे या याचिकेत नमूद करण्यात आले होते.
विनापरवानगी काढले जातात महिलांचे फोटो
फोटोग्राफीमुळे मंदिराची सुरक्षा संकटात सापडली आहे. विशेषतः महिलांचे फोटोही त्यांच्या परवानगीशिवाय काढली जातात. यामुळे त्यांच्यात भीती पसरते, असेही या याचिकेत नमूद करण्यात आले होते. तसेच सन्मानजनक ड्रेस कोड लागू करण्याची मागणीही केली होती. दरम्यान, केरळच्या गुरुवयुर स्थित श्रीकृष्ण मंदिर व तामिळनाडूच्या तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात पूर्वीपासूनच मोबाइल फोनवर बंदी घालण्यात आली आहे.
तिरुचेंदुर स्थित मंदिर प्राधिकरणाने मोबाइलवर बंदी घालण्यासह सन्मानजनक ड्रेस कोड लागू करण्याचे पाऊल उचलले आहे, अशी बाब याचिकाकर्त्याने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर उच्च न्यायालयाने संपूर्ण तामिळनाडूत असे करण्याचे आदेश दिले.