सौराष्ट्र संघाला विजय हजारे ट्रॉफी


02nd December 2022, 11:46 pm
सौराष्ट्र संघाला विजय हजारे ट्रॉफी

न्यूज डेस्क। गोवन वार्ता

अहमदाबाद : सौराष्ट्रने १४ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. सौराष्ट्राने महाराष्ट्रविरुद्ध हा सामना ५ विकेट्सने जिंकला.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या महाराष्ट्र संघाने ५० षटकांत ९ गडी गमावून २४८ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्र संघाने ४६.३ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्य गाठले. शेल्डन जॅक्सनने फलंदाजी करताना सौराष्ट्रकडून शतक झळकावले.

या सामन्यात सौराष्ट्राचा फलंदाज शेल्डन जॅक्सनने १३६ चेंडूत १३३ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या खेळीमुळे संघाला विजय मिळवणे खूप सोपे झाले. जॅक्सनच्या खेळीत एकूण १२ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. याशिवाय सलामीवीर हार्विक देसाईने ६७ चेंडूत ५० धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली.

याशिवाय चिराग जानीने २५ चेंडूत नाबाद ३० धावा करत संघाला शेवटच्या सामन्यात साथ दिली. तर सर्मथ व्यास (१२), अर्पित (१५) आणि परेरक मानकंद (१) मोठे डाव खेळण्यात अपयशी ठरले.

महाराष्ट्राचा गोलंदाज मुकेश चौधरीने ९ षटकांत ३८ धावा देत २ बळी घेतले. याशिवाय विकी ओस्तवालने शानदार गोलंदाजी करत १० षटकांत २० धावा देत २ बळी घेतले. त्याचवेळी सत्यजित बच्छावनेही एक विकेट घेण्यात यश मिळवले. इतर कोणत्याही गोलंदाजाला यश मिळाले नाही. यामध्ये राजवर्धन हंगरगेकर सर्वात महागडा ठरला. त्याने ९ षटकांत ७.८० च्या इकॉनॉमीसह ७० धावा दिल्या.

ऋतुराजचे शतक व्यर्थ

महाराष्ट्राकडून पहिल्या डावात कर्णधार ऋतुराज गायकवाडने १३१ चेंडूत १०८ धावा केल्या. त्याच्या खेळीत एकूण ७ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. मात्र, त्याचे हे शतक संघासाठी कामी येऊ शकले नाही.