हिंदुत्वाच्या मुद्द्याला बंगाली अस्मितेची जोड देत सुवेंदू यांनी घडवले मतांचे प्रचंड ध्रुवीकरण

कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत २०२७ जागा जिंकून भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर ८ मे रोजी सुवेंदू अधिकारी यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून भाजप बंगालमध्ये एका 'बंगाली हिंदू हृदयसम्राटा'च्या शोधात होता, या शोधाचा शेवट सुवेंदू अधिकारींच्या निवडीने झाला. केवळ निवडणुकीतील यश म्हणून नाही, तर बंगालच्या सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक गरजा लक्षात घेऊन भाजपने हा अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतला आहे.

जातीचे गणित आणि 'महिष्य' कार्ड
गेल्या अनेक दशकांपासून बंगालच्या राजकारणावर 'भद्रलोक' (ब्राह्मण आणि कायस्थ) समाजाचे वर्चस्व होते. मात्र, २०२६ च्या निकालांनी हे सिद्ध केले की सत्तेचा रस्ता आता ओबीसी आणि शेतकरी समुदायाच्या अंगणातून जातो. शुभेंदु अधिकारी हे प्रभावशाली 'महिष्य' समाजातून येतात. या समाजाची लोकसंख्या राज्यात सुमारे १० टक्के आहे. मेदिनीपूर पट्ट्यात या समाजाचे मोठे वर्चस्व असून, तृणमूल काँग्रेसच्या अल्पसंख्याक तुष्टीकरणाच्या धोरणामुळे हा समाज दुरावला होता. सुवेंदूंना मुख्यमंत्री करून भाजपने केवळ महिष्य समाजच नाही, तर उत्तर बंगालमधील राजबंशी आणि मतुआ समुदायालाही एक सकारात्मक संदेश दिला आहे की, भाजप आता उपेक्षित आणि बहुजन समाजाच्या नेतृत्वाला स्थान देण्यास कटिबद्ध आहे.

आक्रमक हिंदुत्व आणि बंगाली अस्मिता
भाजपने यापूर्वी अनेक 'अकॅडमिक' किंवा बाहेरून आयात केलेल्या नेत्यांवर प्रयोग केले, पण त्यांना यश आले नाही. शुभेंदु अधिकारी यांचे राजकारण हे 'आक्रमक हिंदुत्वा'वर आधारित आहे. त्यांनी 'जय श्री राम' या घोषणेला केवळ हिंदी भाषिक राज्यांची घोषणा न ठेवता, ती बंगालमधील तुष्टीकरणाविरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक बनवले. मालडा आणि मुर्शिदाबाद सारख्या अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातही हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्यात ते यशस्वी झाले. संघाची विचारधारा आणि बंगाली अस्मिता यांचा त्यांनी साधलेला मेळ हा भाजपसाठी सत्तेचा 'मास्टर की' ठरला आहे.

संघटनात्मक मजबुती आणि 'लढाऊ' नेतृत्व
तृणमूल काँग्रेसकडे बूथ स्तरावर एक अत्यंत आक्रमक संघटनात्मक यंत्रणा आहे. या यंत्रणेला उत्तर देण्यासाठी भाजपला एका अशा नेत्याची गरज होती जो केवळ खुर्चीवर बसून आदेश देणार नाही, तर रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. सुवेंदू अधिकारी यांनी आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून मेदिनीपूर आणि दक्षिण बंगालमध्ये स्वतःचे 'दादा-गिरी' नेटवर्क तयार केले आहे. तृणमूलच्या अंतर्गत कार्यपद्धतीची खडान् खडा माहिती असलेल्या सुवेंदूंनी भाजपला ती 'लढाऊ' क्षमता मिळवून दिली, जी याआधी पक्षाकडे नव्हती. त्यांना केवळ संघटनात्मक प्रमुख म्हणून नाही, तर 'कॉम्बॅट कमांडर' म्हणून पाहिले जाते.

'जायंट किलर'ची ओळख
शुभेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्री पदाची दावेदारी त्या क्षणीच पक्की झाली होती, जेव्हा त्यांनी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांचा १५,००० पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. एखाद्या बसलेल्या मुख्यमंत्र्याला सलग दोन वेळा (२०२१ मध्ये नंदीग्राम आणि २०२६ मध्ये भवानीपूर) पराभूत करणे ही छोटी गोष्ट अजिबात नाही. या विजयाने त्यांना ती राजकीय 'वैधता' मिळवून दिली जी बंगालमधील इतर कोणत्याही भाजप नेत्याकडे नाही. दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वासाठी शुभेंदु हे केवळ एक मुख्यमंत्री नाहीत, तर ते असे नेते आहेत ज्यांनी तृणमूल काँग्रेसच्या 'अजिंक्य' असण्याचा भ्रम तोडून टाकला आहे. म्हणूनच, बंगालच्या भविष्यासाठी भाजपने एका अनुभवी, आक्रमक आणि सर्वसमावेशक नेत्याची निवड केली आहे.
