जंतर-मंतरवर जोशी कुटुंबीयांचे आंदोलन; दोषींना फाशी देण्याची मागणी

पणजी : हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ क्लबमध्ये घडलेल्या भीषण अग्नितांडवाचे पडसाद आता राजधानी दिल्लीत उमटले आहेत. या दुर्घटनेत आपल्या आप्तांना गमावलेल्या पीडित कुटुंबीयांनी रविवारी दिल्लीतील जंतर-मंतरवर जोरदार निदर्शने केली. ‘बेल नको, जेल हवी; खुन्यांना फाशी द्या’ अशा घोषणा देत त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. गोव्यात घडलेल्या या घटनेविरोधात दिल्लीत झालेले हे पहिलेच मोठे आंदोलन आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व भावना जोशी करत आहेत. बर्च दुर्घटनेत जोशी कुटुंबातील तब्बल चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावल्याचे दुःख आणि संताप व्यक्त करत जोशी कुटुंबीयांनी रविवारी दिल्लीत ठिय्या मांडला. दोषींना जामीन मिळू नये आणि त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
६ डिसेंबरच्या रात्री हडफडे येथील या क्लबला लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, ज्यात पर्यटक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. याशिवाय ६ जण जखमी झाले होते. मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी मदत मिळाली असली, तरी न्यायाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.
या प्रकरणी पोलिसांनी क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, जमिनीचा मूळ मालक सुरिंदरकुमार खोसला हा अद्यापही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी अद्याप न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झालेले नाही. लुथरा बंधूंवर दिल्लीतही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
सरकारने दंडाधिकाऱ्यांमार्फत केलेल्या चौकशीनंतर प्रशासकीय पातळीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे:
| अधिकारी / पदाधिकारी | केलेली कारवाई |
|---|---|
| रोशन रेडकर (तत्कालीन सरपंच, हडफडे) | अपात्र घोषित |
| रघुवीर बागकर (तत्कालीन पंचायत सचिव) | सेवेतून बडतर्फ |
| सिद्धी हळर्णकर (तत्कालीन पंचायत संचालक) | निलंबित |
| शमिला मोंतेरो (तत्कालीन सदस्य सचिव, GSPCB) | निलंबित |