दिल्लीचा ५९ धावांनी पराभव : सूर्या, नमनचा झंझावात; सँटनर, बुमराहचे प्रत्येकी ३ बळी
मुंबई : सूर्यकुमार यादव याचे अर्धशतक आणि नमन धीर याने अखेरच्या क्षणी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियममध्ये दिल्लीसमोर १८१ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र दिल्लीचा संघ १८.२ षटकांत सर्वबाद १२१ धावाच करू शकला. या विजयामुळे मुंबईने प्ले ऑफमध्ये दिमाखात प्रवेश केला. तर दिल्लीचे प्ले ऑफचे स्वप्न भंगले आहे.
मुंबईने २० षटकांमध्ये ५ गडी गमावून १८० धावा केल्या होत्या. सूर्यकुमार याचा अपवाद वगळता मुंबईच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांना काही खास करता आले नाही. त्यामुळे मुंबई अडचणीत सापडली होती. त्यामुळे मुंबई १५० धावापर्यंत तरी पोहचेल का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र तिलक वर्मा २७ धावांवर आऊट झाल्यानंतर नमन धीर याने सूर्यकुमारच्या सोबतीने जोरदार फटकेबाजी केली. धीर आणि सूर्या या जोडीने शेवटच्या २ ओव्हरमध्ये ४८ धावा कुटल्या. त्यामुळे मुंबईला १८० पर्यंत मजल मारता आली.
नाणेफेक गमावून फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईला खास सुरुवात करता आली नाही. मुंबईने २३ धावांवर पहिली विकेट गमावली. रोहित शर्मा ५ धावा करुन बाद झाला. रोहितकडून वानखेडे स्टेडियममध्ये मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रोहितने निराशा केली. त्यानंतर विल जॅक्स आणि रायन रिकेल्टन हे दोघे ठराविक अंतराने बाद झाले. जॅक्सने २१ आणि रायनने २५ धावा केल्या. हे दोघे आऊट झाल्याने मुंबईची ६.४ षटकामध्ये ३ बाद ५८ अशी स्थिती झाली. त्यानंतर सूर्यकुमार आणि तिलक वर्मा या जोडीने पलटणचा डाव सावरला.
सूर्या आणि तिलक या दोघांनी १-१ धाव जोडत पलटणला पुढे नेले. सूर्याने या दरम्यान संधी मिळेल तेव्हा काही फटके मारले. अशाप्रकारे या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र त्यानंतर मुकेश कुमारने ही सेट जोडी फोडली. मुकेशने तिलक वर्माला मैदानाबाहेर पाठवले. तिलकला मोठी खेळी करता आली नाही. मात्र त्याने निर्णायक क्षणी सूर्याला साथ दिली. तिलकने २७ चेंडूत २७ धावा केल्या. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या मैदानात आला. पलटण अडचणीत असल्याने हार्दिककडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र हार्दिकने निराशा केली. हार्दिक ३ धावा करून बाद झाला.
शेवटच्या २ षटकांत गेम बदलला
सूर्यकुमार यादव आणि नमन धीर या दोघांनी काही चेंडू खेळून काढले. त्यानंतर दोघांनी निर्णायक क्षणी गिअर बदलला. या दोघांनी शेवटच्या २ षटकांमध्ये ४८ धावा ठोकल्या. तसेच या जोडीने सहाव्या गड्यासाठी नाबाद ४७ धावांची भागिदारी रचली. सूर्याने ४३ चेंडूमध्ये नाबाद ७३ धावा केल्या. तर नमन धीर याने ८ चेंडूत २ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने नाबाद २४ धावांची निर्णायक खेळी केली.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात चांगली झाली नाही. के. एल. राहुलने जलद सुरुवात करत ६ चेंडूत ११ धावा केल्या, पण तो ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर रिकेटनकडून झेलबाद झाला. कर्णधार फाफ डू प्लेसिस केवळ ६ धावा काढून दीपक चहरचा शिकार ठरला. अभिषेक पोरेल फक्त ६ धावा काढून विल जॅक्सच्या चेंडूवर यष्टिचित झाला. समीर रिजवीचा ३९ या धावसंख्येवर सँटनरने त्रिफळा उडवला. विप्रज निगमने दमदार खेळी करत ११ चेंडूत २० धावा केल्या पण तो सँटनरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.ट्रिस्टन स्टब्स ४ चेंडूत २ धावा करत जसप्रीत बुमराहकडून पायचीत झाला. आशुतोष शर्मा १८ धावा करून सँटनरचा शिकार ठरला.
बुमराह-सँटनरची भेदक गोलंदाजी
या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी अचूक आणि प्रभावी कामगिरी करत सामना आपल्या बाजूने झुकवला. विशेषतः मिचेल सँटनर आणि जसप्रीत बुमराह यांनी जबरदस्त माऱ्याने दिल्लीच्या फलंदाजांची कोंडी केली. मिचेल सँटनरने 4 षटकांत केवळ ११ धावा देऊन ३ बळी घेतले. जसप्रीत बुमराहने ३.२ षटकांत १२ धावा देत ३ बळी घेतले. ट्रेंट बोल्टने ४ षटकांत २९ धावा देत १ बळी घेतला. दीपक चहरने ३ षटकांत २२ धावांत १ बळी, विल जॅक्सने एकमेव षटकात १६ धावा देत १ बळी, तर कर्ण शर्माने ३ षटकांत ३१ धावा देत १ बळी घेतला. या सामन्यात गोलंदाजांनी एकत्रितपणे चांगली कामगिरी करत दिल्लीच्या फलंदाजांवर दडपण आणले. विशेषतः बुमराह आणि सँटनर यांनी ठराविक टप्प्यांवर विकेट्स घेत खेळाचा कल बदलला.
१६ ते २० षटकांदरम्यान २००+ चा स्ट्राइक रेट असलेले फलंदाज
२१६ - आंद्रे रसेल
२०९.८० - सूर्यकुमार यादव
२०६.८४ - ट्रिस्टन स्टब्स
२०१.७५ - हेनरिक क्लासेन
२०१.४९ - टीम डेव्हिड
२०० - नमन धीर
१९-२० षटकांमध्ये मुंबईच्या सर्वाधिक धावा
५१/० वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई वानखेडे, २०२४
४८/० वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई वानखेडे, २०२५
४५/० वि. चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई वानखेडे, २०१९
४४/० वि. पंजाब किंग्ज, अबु धाबी, २०२०
४२/१ वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई वानखेडे, २०१३
एका हंगामात ५०० हून अधिक धावा करणारे खेळाडू
८ वेळा - विराट कोहली
७ वेळा - डेव्हिड वॉर्नर
७ वेळा - के. एल. राहुल
५ वेळा - शिखर धवन
आयपीएल २०२५ मध्ये पहिल्या ६ षटकांत सर्वाधिक बळी
९ - मोहम्मद सिराज (इकोनॉमी रेट: ८.७)
९ - खलील अहमद (इकोनॉमी रेट: ९.२)
८ - ट्रेंट बोल्ट (इकोनॉमी रेट: ८.३७)
८ - दीपक चहर (इकोनॉमी रेट: ८.६)
८ - अर्शदीप सिंग (इकोनॉमी रेट: ८.०९)