देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार : गोवा सरकारतर्फे पणजीत रवी नाईक यांना आदरांजली
माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : माजी मुख्यमंत्री कै. रवी नाईक यांनी तळागाळातील आणि आवाज नसलेल्या सामान्य माणसांसाठी कार्य केले, कूळ आणि मुंडकारांसाठी वारसा निर्माण केला. गृहमंत्री म्हणून घेतलेली कणखर भूमिका आणि कृषिमंत्री म्हणून जपलेली संवेदनशीलता जनतेच्या नेहमीच लक्षात राहील. उत्तम व्हॉलीबॉलपटू असलेल्या रवी यांनी खिलाडूवृत्ती राजकारणातही कायम ठेवली. त्यांनी आयुष्यात मोठा संघर्ष केला; पण व्यक्तिगत कोणाचा द्वेष केला नाही, असे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
माजी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री कै. रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गोवा सरकारतर्फे रविवारी सकाळी कला अकादमीत शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्यासह अनेक मंत्री, आमदार, सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी, सुप्रसिद्ध उद्योजक अवधूत तिंबलो, माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप, रवी यांचे पुत्र रितेश, रॉय नाईक आदी उपस्थित होते.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले की, भाऊसाहेब बांदोडकर, शशिकला काकोडकर यांसारख्या नेत्यांच्या पंक्तीत रवी नाईक यांचे नाव आहे. नेतृत्व कसे असावे? लोकांना कसे संघटित करावे? हे रवी नाईक यांनी दाखवून दिले. अॅड. रमाकांत खलप म्हणाले, भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर रवी नाईक हेच बहुजन समाजाचे नेते होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानवडे, सभापती गणेश गावकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी रवी नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली.
रवी नाईकांमुळेच तपोभूमीचे स्वप्न साकार : ब्रह्मेशानंद स्वामी
कुंडई येथील तपोभूमीचे सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी म्हणाले, श्री ब्रह्मानंद स्वामींना दिलेला शब्द रवी नाईक यांनी पाळला. त्यांच्यामुळेच कुंडईतील तपोभूमीचे स्वप्न साकार झाले. ते देव देव करणारे नव्हते; पण देवाला मानणाऱ्यांसाठी काम करणारे होते.
..
रवी नाईक यांची कार्यशैली लोकांची मने जिंकणारी : अवधूत तिंबलो
सुप्रसिद्ध उद्योजक अवधूत तिंबलो म्हणाले की, रवी नाईक यांच्याकडे लोकांची अचूक पारख करण्याचा चांगला गुण होता. रवी नाईक यांची कार्यशैली लोकांची मने जिंकणारी होती. ते खांद्यावर हात ठेवून लोकांना आपलेसे करत. याच आपुलकीने त्यांनी गोव्यासाठी आणि समाजासाठी मोठे योगदान दिले.
रवी युवकांसाठी प्रेरणास्थान, सरकारसाठी मार्गदर्शक : मुख्यमंत्री
माजी मुख्यमंत्री स्व. रवी नाईक हे युवकांसाठी प्रेरणास्थान, तर सरकारसाठी मार्गदर्शक होते. ते कूळ आणि मुंडकार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करायचे. मी त्यांना कायम ‘पात्रांव’ म्हणायचो. पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर आणि स्व. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर जनसागर लोटला होता. तेच चित्र रवी नाईक यांच्या अंत्ययात्रेवेळीही पहायला मिळाले. रवी नाईक बहुजन समाजाचे कैवारी होते. राजकीय वारसा नसतानाही त्यांनी मंत्री, मुख्यमंत्री, खासदार, अशी महत्त्वाची पदे भूषवली. त्यांचे कार्य कायम स्मरणात राहील.