पुढील काही दिवस राज्यात उष्ण आणि दमट परिस्थिती कायम राहण्याची अपेक्षा
पणजी : आज गोव्यात आणि पर्यायाने अवघ्या देशात होळी साजरी होत आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने उष्णतेचा इशारा जारी केला असून तो उद्या १५ मार्चपर्यंत वाढवला आहे. संपूर्ण राज्यात उष्ण आणि दमट परिस्थिती कायम राहण्याची अपेक्षा असल्याने, लोकांनी घरं बाहेर बाहेर पडताना अतिरिक्त खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शुक्रवारी उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही ठिकाणी दमट परिस्थिती राहून तापमान ३५°C ते ३७°C दरम्यान वाढण्याची शक्यता आहे. होळीच्या रंगांचा आनंद लुटत असताना, हायड्रेटेड राहणे, योग्य कपडे घालणे आणि सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहणे टाळणे आवश्यक आहे. गेल्या १४ दिवसांत पडलेल्या उन्हाची दाहकता लक्षात घेता उष्णतेशी संबंधित आजार टाळण्यासाठी हवामान खात्याने सर्वांना सुरक्षित राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे
रॅली किंवा पार्टीसाठी जाणाऱ्या लोकांना उच्च आर्द्रता आणि तापमान असलेल्या भागात जास्त काळ राहणे टाळणे महत्त्वाचे आहे. शरीराला पुन्हा हायड्रेट करण्यासाठी ओआरएस, लस्सी, पन्हे, उसाचा रस, लिंबू पाणी, ताक इत्यादी घरगुती पेये वापरावीत. दिवसाच्या पीक अवर्समध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत उष्णतेमुळे पेटके आणि उष्माघात होण्याची शक्यता आहे. लोकांनी खबरदारी द्यावी असेही हवामान खात्याने म्हटले आहे.
उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये १९ मार्चपर्यंत कोरडे हवामान राहण्याचा अंदाज असल्याने, पुढील सात दिवसांत कमाल तापमान ३४°C ते ३६°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सध्या असलेले उष्ण आणि दमट हवामान पुढील काही काळ जैसे थे राहण्याची अपेक्षा आहे. आज शुक्रवारी, पणजीमध्ये कमाल तापमान दुपारी १.३० पर्यंत ३५.४°C नोंदवले गेले, तर मुरगावमध्ये हवामान ३६.२°C पर्यंत पोहोचले होते. दोन्ही भागात किमान तापमान २४.६°C नोंदवले गेले.