बहुराष्ट्रीय कंपन्यांची जीवघेणी चलाखी

Story: वेध |
28th April, 07:10 am
बहुराष्ट्रीय कंपन्यांची जीवघेणी चलाखी

सकस आणि चौकस आहार असणे ही काळाची गरज आहे. मात्र अलिकडच्या काळात बाजारात मिळणार्‍या खाद्यपदार्थातील पोषणाचा दर्जा घसरत असल्याने आणि त्यातही फास्ट फूडचा बोलबाला होऊ लागल्याने आपले आरोग्य धोक्यात आले आहे. प्रामुख्याने तरुणाईत जंकफूडची वाढणारी सवय ही चिंताजनक पातळीवर येऊन ठेपली आहे. विशेषतः बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत सातत्याने शंका उपस्थित होत आहेत. या कंपन्या जाहिरातींच्या मार्‍याने आपली उत्पादने आरोग्यवर्धक असल्याचे सांगत असल्या तरी सत्य बरेचदा वेगळेच असते. अलीकडेच एनर्जी ड्रिंस म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘बोर्नव्हिटा’मधील साखरेचे असणारे अति प्रमाण उघड झाले असून ते पेय आरोग्यवर्धक श्रेणीतून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घराघरांमध्ये मूल पाच वर्षांपेक्षा अधिक वयाचे झाले की त्याला बोर्नव्हिटा, कॉम्प्लॅन यांसारखी पेये देण्यासाठी पालकांची जणू स्पर्धाच लागलेली दिसते; अशा पालकांचे डोळे उघडणारे हे पाऊल आहे. 

अन्नपदार्थाविषयी वाढत्या जागरुकतेमुळे अलिकडेच बहुराष्ट्रीय अन्नपदार्थ उत्पादन कंपन्यांचा खरा चेहरा उघड होत आहे. बोर्नव्हिटा हा लहान मुलांसाठी आरोग्यवर्धक असल्याचे सांगितले जात होते. पण प्रत्यक्षात मुलांनी एकदा प्यायल्यानंतर त्याची गोडी लागावी यासाठी त्यामध्ये अतिरित प्रमाणात साखर मिसळली जात होती. म्हणजेच लहान मुलांना, तरुणांना चटक लावण्याचे कामच उत्पादक कंपनीकडून केले जात होते. त्याची तपासणी केल्यानंतर सरकारने हे पेय आरोग्यवर्धक असल्याचे सांगू नये, अशी तंबी दिली आहे. 

या उत्पादनाची सवय लागावी यासाठीच भारतासह विकसनशील देशांमध्ये  या पदार्थात साखरेचे ज्यादा प्रमाण वापरले जात होते, हे निष्पन्न झाले. ‘पब्लिक आय’ या स्वित्झर्लंडमधील स्वयंसेवी संघटनेने आणि इंटरनॅशनल बेबी फूड अ‍ॅशन नेटवर्कच्या निष्कर्षात काही धकादायक खुलासे झाले होते. यात बोर्नव्हिटामध्ये प्रमाणाबाहेर साखर असल्याचे आढळले होते. नेस्ले कंपनीने युरोपातील बाजाराच्या तुलनेत भारतात आणि अन्य विकसनशील देशात म्हणजेच आफ्रिका, लॅटिन अमेरिकेत अधिक साखर असलेल्या उत्पादनाची विक्री केली. सरकारच्या आदेशानंतर नेल्से इंडियाने आपल्या उत्पादनात ३० टक्यांपर्यंत साखर कमी केल्याचा दावा केला. विशेष म्हणजे ही कंपनी नेस कॅफे, सेरेलॅक, मॅगी यांसारख्या लोकप्रिय खाद्यपदार्थांची निर्मिती करते. पण विकसित आणि विकसनशील देशांमधील उत्पादनांमध्ये कंपनीकडून कसा भेदभाव केला जातो, हे  यानिमित्ताने लक्षात आले. शरीरात अतिप्रमाणात साखर गेल्यास मधुमेह, हृदयविकारांपासून अन्यही आजार जडण्याचा धोका असतो.  याची ‘नेस्ले’सारख्या जगद्विख्यात बहुराष्ट्रीय कंपनीला कल्पना नसेल, असे मानणे वेडगळपणाचे ठरेल. प्रत्यक्षात या सर्वांची माहिती असल्यामुळेच बहुराष्ट्रीय कंपन्या जाणीवपूर्वक लोकांच्या आरोग्याशी खेळ करत असतात. 

निर्गुंतणुकीच्या माध्यमातून संपूर्ण जगाचे शोषण करणारे युरोपीय आणि पश्चिम देश हे वर्षानुवर्षांपासून लोकशाही देशांना अशाच प्रकारे फसवत आले आहेत. व्यापारी तत्त्वाने वागत विकसनशील देशांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत.  खाद्यपदार्थ आणि शीतपेयांमध्ये अधिक साखर अणि मीठाचा समावेश करुन युवकांना त्याची चटक लावण्याचे काम केले जाते. त्यामुळे युवकांना वेगळाच आनंद मिळाल्याचा भास होतो. याखेरीज प्रिझर्व्हेटिव्हज, अजिनोमोटोसारखे चव वाढवून चटक लावणारे आरोग्यासाठी हानिकारक असणारे घटक त्यात मिसळले जात असतात. पण यामुळे असंसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो. आरोग्याला हानिकारक असलेल्या या पदार्थांच्या नियमित सेवनातून अनेक आजार होतात. विशेषतः वजन वाढून स्थूलपणा येतो आणि एकदा स्थूलपणा आला की पुढील काळात अनेक व्याधी या सहव्याधी म्हणून जडतात. आज बाजारात मिळणारी बहुराष्ट्रीय कंपन्यांची कोणतीही शीतपेये, डबांबद ज्यूस, एनर्जी ड्रिंस, बिस्किटे वापरुन पाहिल्यास त्यात साखरेचे, सोड्याचे, मीठाचे प्रमाण अधिक असते. या खाद्यपदार्थाचा समावेश अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थात होतो. अलिकडेच ब्रिटिश जर्नलच्या एका खुलाशानुसार अशा खाद्यपदार्थामुळे जीवनमानावरही नकारात्मक परिणाम होतो. आपल्या आहारात अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचे प्रमाण १० टक्यांपेक्षा अधिक असेल तर शरीरात कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, नैराश्य यासारखे आजार बळावतात. भारतात अलिकडेच अशा आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांची संख्या वेगाने वाढली आहे. आपल्या देशातील ग्राहकराजा जागरुक झाला तर या गोष्टी थांबविल्या जावू शकतील. त्याचबरोबर खाद्यपदार्थात किती प्रमाणात साखर आणि मीठ आहे त्याचा उल्लेख पॅकवर ठळक शब्दांत नमूद करणे गरजेचे आहे. कमी साखर असेल तर त्याचे प्रमाण किती आहे, हे देखील सांगणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात साखर आणि मीठ यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा ही सक्षम असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्येक राज्यात प्रयोगशाळा स्थापन करून लोकांच्या आरोग्याशी खेळणार्‍या पदार्थांची वेळोवेळी चाचपणी करायला हवी. तसेच दोषी आढळणार्‍या कंपन्यांवर कठोर कारवाईची देखील व्यवस्था हवी. तसेच दिशाभूल करणार्‍या जाहीरातींना चाप बसवायला हवा.

एका अभ्यासानुसार, इंडियन एनर्जी ड्रिंस अणि स्पोर्टस ड्रिंसचा सध्याचा बाजार हा ४.७ अब्ज डॉलरचा आहे.  मात्र यामध्ये बहुतांश एनर्जी ड्रिंस हे अतिशर्करायुक्त आहेत. असे असूनही एनर्जी ड्रिंंसची विक्री ही दरवर्षी ५० टक्यांनी वाढत आहे. युवकांकडून त्याचे अधिक सेवन केले जात आहे. ही बाब चिंताजनक आहे. कारण यामुळे तरुणांना अकाली वृद्धत्व येण्याचे प्रमाण वाढले असून खुद्द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथोरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) ने ही बाब गंभीर असल्याचे म्हटले आहे. याचे गांभीर्य लक्षात घेता इ-कॉमर्स कंपन्यांनी आपल्या संकेतस्थळावर विकल्या जाणार्‍या फूड प्रॉडक्टची माहिती योग्य रितीने द्यावी, असे ‘एफएसएसएआय’ने सांगितले आहे. आज जागतिकीकरणाच्या काळात अनेक प्रगत पश्चिमी राष्ट्रांशी  व्यापार करार होत आहेत, मुक्त व्यापार करार होत आहेत. त्यातून येणार्‍या काळात अनेक उत्पादने भारतीय बाजारपेठेत येणार आहेत. त्यांची गुणवत्ता तपासून पाहणे आणि भारतीय प्रकृतीमानाच्या दृष्टीने त्यांचा विचार होणे गरजेचे आहे. तसेच जीवाशी खेळण्याचा प्रयत्न झाल्यास अशा कंपन्यांना तत्काळ शासन करणे आवश्यक आहे. 


सूर्यकांत पाठक, राष्ट्रीय उपाध्यक्ष, अ. भा. ग्राहक पंचायत