नवी दिल्ली : बांदा कारागृहात बंदिस्त कुख्यात माफिया तथा माजी आमदार मुख्तार अन्सारी याचा गुरुवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. फिरोजाबादमध्येही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी फ्लॅग मार्च काढला आहे. बांदा जिल्ह्यातही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
कुख्यात माफिया मुख्तार अन्सारी याला स्थानिक वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्याला हृदयविकाराच झटका आहे. त्यानंतर डीएम, एसपीसह फोर्सला पाचारण करण्यात आले आहे. डीजीपी मुख्यालयाने दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्तार अन्सारी यांचा दुसरा मुलगा उमर अन्सारी रात्री दोनच्या सुमारास बांदा येथे पोहोचला. मुख्तार अन्सारीचे पोस्टमॉर्टम २ डॉक्टरांच्या एक पॅनलने केले आहे. त्याची व्हिडिओग्राफी देखील करण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्तार अन्सारीच्या मृत्यूबाबत त्याचा मोठा भाऊ सिबकतुल्लाह अन्सारी यांने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्हाला मुख्तारच्या मृत्यूची माहिती प्रसारमाध्यमांद्वारेच मिळाली. प्रशासनाने कोणतीही माहिती दिली नाही. मुख्तार अन्सारी १८ मार्चपासून अस्वस्थ होता. वारंवार विनंती करूनही त्याला वेळेवर उपचार मिळत नव्हते. मुख्तारच्या मृत्यूची तीन सदस्यीय टीम दंडाधिकारी चौकशी करणार आहे, असे सिबकतुल्लाह याने सांगितले आहे.
मुलाचा आरोप, वडिलांना दिले स्लो पॉयझन
अन्सारीचे कुटुंबीय मंगळवारी त्याा भेटण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात गेले होते. यावेळी मुख्तारला फक्त अफजल अन्सारी भेटता आले. दरम्यान, मुख्तारचा मुलगा उमर याने सरकारवर गंभीर आरोप करत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कारागृह प्रशासनावर जेवणात ‘स्लो पॉइझन’ दिल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे मुख्तारची प्रकृती खालावल्यानंतर त्याला दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. येथे उपचारासाठी ९ डॉक्टरांचे पथक तैनात करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्याला बद्धकोष्ठतेची समस्या असल्याचे सांगितले होते. चाचणीचा अहवाल सामान्य आल्यानंतर उपचार करून त्यांना पुन्हा कारागृहात पाठवण्यात आले, असे उमर याने म्हटले आहे.
अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर केली टिका
प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक ठिकाणी कोणाच्या तरी जीवाचे रक्षण करणे ही सरकारची पहिली जबाबदारी आणि कर्तव्य आहे. सर्व संशयास्पद प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अंतर्गत तपास व्हायला हवा. उत्तर प्रदेशचे सरकार लोकांचे रक्षण करू शकत नाही. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोशल मीडियावरून केली आहे.