सोनसोडो कचरा प्रकल्पावरून काँग्रेस, भाजपकडून राजकारण

आमदार विजय सरदेसाई यांचा आरोप


24th October 2020, 10:33 pm
सोनसोडो कचरा प्रकल्पावरून काँग्रेस, भाजपकडून राजकारण

मुख्य बातमीच्या शेजारी तीन कॉलम घेणे

---

फोटो : पत्रकार परिषदेत बोलताना आमदार विजय सरदेसाई. (संतोष मिरजकर)

प्रतिनिधी। गोवन वार्ता

मडगाव : सोनसोडो कचरा प्रश्न सुटण्यासाठीच पालिकेकडून गोवा कचरा व्यवस्थापनाकडून आलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मात्र, काँग्रेस व भाजपचे नगरसेवक संयुक्तरीत्या याला विरोध करत याचे राजकारण करू पाहत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिलेल्या प्रकल्पाला भाजप नगरसेवक विरोध करत असल्यास राज्य सरकारला यावर राजकारण करायचे आहे का, यावर मुख्यमंत्री व प्रदेश भाजपने स्पष्ट करावे, असे आवाहन गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केले.

आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत सोनसोडो येथील बायोमिथेनेशन प्रकल्पाला विरोध दर्शवताना भाजप व काँग्रेसच्या नगरसेवकांनी घातलेल्या गोंधळावर भाष्य केले. सरदेसाई म्हणाले की, मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाने पाठवलेल्या अंदाजित खर्चाच्या प्रस्तावाला मडगाव पालिकेकडून मंजुरी देण्यात आली. यावेळी आर्थुर डिसिल्वा यांनी सेटिंग असल्याचे म्हटले. त्यावर नगराध्यक्षांनी प्रकल्प मुख्यमंत्र्यांकडून मंजूर झालेला असल्याने त्यांनाच विचारण्यास सांगितले. यावर भाजप व काँग्रेसच्या नगरसेवकांनी गोंधळ घालत प्रकल्पाला विरोध दर्शवला. यामुळे भाजप व काँग्रेसच्या नगरसेवकांना सोनसोडोचा प्रश्न सुटलेला नको, हेच दिसून येते. त्यांना केवळ कचर्‍याचे राजकारण करायचे आहे. मंत्री लोबो यांनी स्पष्टीकरण दिले त्यातून हा प्रकल्पाचा खर्च गोवा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडून संमत झाल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपच्या राज्य सरकारने मंजूर केलेल्या प्रकल्पाच्या प्रस्तावाला भाजपचे नगरसेवक विरोध करतात, यावर प्रदेश भाजप व मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. 

विरोध करणार्‍यांनी उपायही सुचवावेत

कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र खाते असताना जी सुडा कचर्‍याबाबत निविदा कशी काढते, असा प्रश्न आमदार विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला. आता सरकारातील मंत्री पुढील वर्षभरात किती पैसे गोळा करता येतील, त्याचाच विचार करत आहेत. शॅडो कौन्सिलला वाढीव खर्चाबाबत आक्षेप असल्यास त्यावर चर्चा व्हावी; पण प्रकल्पाला विरोध करणार्‍यांनी उपायही सुचवावेत, अशी मागणीही सरदेसाई यांनी केली.