पणजी : गोव्यात एक ते दोन अति महत्त्वाची खनिजे असण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार खाजगी कंपन्यांनी गोव्यातील अती महत्त्वाच्या खनिज शोधासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गुरुवारी केंद्रीय खनिज खात्यातर्फे देशभरातील १३ ठिकाणांवरील खनिज ब्लॉक लिलावाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय खनिज मंत्री जी किशन रेड्डी, सचिव व्ही एन कांतराव, राज्याचे मुख्य सचिव व्ही कांडावेलू व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, खनिज व्यवसायामुळे गोव्याला खूप फायदा झाला आहे. या क्षेत्राने गोव्यात रोजगानिर्मिती करून अर्थव्यवस्थेला योगदान दिले आहे. या व्यवसायाला गोव्यात पहिल्यापासूनच महत्त्व आहे. अती महत्त्वाची खनिजे देशाच्या सर्व क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावतात. हरित ऊर्जा, इलेक्ट्रोनिक्स क्षेत्रात ही खनिजे उपयुक्त ठरतात. केंद्र सरकारने याचा विचार करूनच देशातील अशा खनिजांचा शोध घेण्यासाठी यामध्ये खाजगी क्षेत्राला समावून घेतले आहे. यामुळे अति महत्त्वाच्या खनिज क्षेत्रात देश आत्मनिर्भर होणार आहे.
ते म्हणाले, गोव्याला खाण व्यवसायाचा मोठा इतिहास आहे. आमचे सरकार जबाबदार आणि शाश्वत खाण उद्योगाला पाठिंबा देत आहे. एआय किंवा अन्य तंत्रज्ञानाचा वापर गोव्यातील खाण उद्योगांना नक्कीच उपयुक्त ठरेल. केंद्र सरकारचे नवीन खनिज शोध धोरण गोव्यासाठी महत्त्वाचे आहे. गोव्यात अती महत्त्वाच्या खनिज शोधासाठी सरकार सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. यासाठी या क्षेत्रातील खाजगी कंपन्या व अन्य भागधारकांनी पुढाकार घ्यावा. त्यांच्यासाठी ही मोठी संधी ठरणार आहे.
या वर्षात खाणी मोठ्या प्रमाणात सुरू होतील
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मंत्री जी किशन रेड्डी यांनी राज्यातील खाण उद्योगांचा आढावा घेतला. राज्यात आतापर्यंत १२ खाण ब्लॉकचा लिलाव झाला आहे. यातील ९ ब्लॉक लवकरच सुरू होतील. उरलेल्या ब्लॉकच्या पर्यावरणीय दाखल्यांबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालय लवकरच निर्णय घेईल. या वर्षात खाणी मोठ्या प्रमाणात सुरू होतील.