एडीआरने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे
नवी दिल्ली : १७ व्या लोकसभेच्या कार्यकाळात बालूरघाटचे भाजप खासदार आणि पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी सर्वाधिक म्हणजे एकूण ५९६ प्रश्न विचारले आहेत. तर कधीही गैरहजर न राहता भाजप खासदार तीरथ सिंह रावत यांनी सर्वाधिक काळ संसदेत हजेरी लावली आहे, असे एडीआरने जारी केलेल्या अहवालातून समोर आले आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीआरने एक डेटा जारी केला आहे. या आकडेवारीनुसार १७ व्या लोकसभेच्या कार्यकाळात सर्वाधिक वेळ संसदेत कोण उपस्थित होते, कोणी सर्वाधिक प्रश्न विचारले आणि किती विधेयके किती वेळात मंजूर झाली हे सांगण्यात आले आहे.
एडीआरच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या सर्वोत्तम १० लोकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत पहिल्या स्थानावर बालूरघाटचे भाजप खासदार आणि पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार आहेत. सुकांत यांनी १७ व्या लोकसभेत एकूण ५९६ प्रश्न विचारले आहेत. ADR अहवालानुसार एकूण ५०५ खासदारांनी सभागृहात ९२,२७१ प्रश्न विचारले आहेत.
संसदेत सर्वाधिक उपस्थित राहणाऱ्या खासदारांमध्ये भाजप खासदार तीरथ सिंह रावत यांचे नाव आहे. हरिद्वारचे खासदार डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांची सर्वात कमी उपस्थिती होती. राज्य-आधारित डेटाबद्दल बोलायचे झाल्यास, छत्तीसगड आणि गुजरातच्या खासदारांची संसदेत सर्वाधिक उपस्थिती आहे. या राज्यांतील खासदारांची सरासरी २१६ दिवसांची उपस्थिती नोंदवण्यात आली आहे. तर उत्तराखंडमधील पाच खासदारांची सरासरी १८८ दिवसांची उपस्थिती नोंदवण्यात आली आहे. तसेच प्रश्न विचारण्याबाबत बोलायचे झाले तर महाराष्ट्राच्या खासदारांनी गेल्या ५ वर्षात ३१५ प्रश्न विचारले असून या यादीत ते पहिल्या क्रमांकावर आहेत.
संसदेत सर्वाधिक प्रश्न कोणी विचारले?
संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये भाजप खासदार डॉ. सुकांत मजुमदार यांचे नाव आहे. सुकांत मजुमदार हे भाजपच्या तिकीटावर बालूरघाटचे खासदार आहेत. त्यांनी सभागृहात एकूण ५९६ प्रश्न विचारले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेशातील मदसौर लोकसभेचे भाजप खासदार सुधीर गुप्ता आहेत. त्यांनी लोकसभेत एकूण ५८६ प्रश्न विचारले आहेत. विद्युत बरन महातो तिसऱ्या स्थानावर आहेत. महतो हे जमशेदपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर खासदार आहेत. त्यांनी सभागृहात एकूण ५८० प्रश्न विचारले आहेत.