ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि पिंकी आनंद यांच्यासह देशातील ६०० हून अधिक वकिलांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहिले असून देशाची न्यायव्यवस्था कमकुवत करण्यासाठी एक गट सतत कार्यरत असल्याचा दावा केला आहे.
नवी दिल्ली : न्यायव्यवस्थेवरील दबाव आणि न्यायव्यवस्थेची अखंडता कमी करण्याच्या प्रयत्न होत असल्याचा आरोप करत ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांच्यासह देशातील ६०० हून अधिक वकिलांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी देशातील न्यायव्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. या वकिलांमध्ये साळवे यांच्यासह चेतन मित्तल, पिंकी आनंद, हितेश जैन, मनन कुमार मिश्रा, आदिश अग्रवाल, उज्ज्वला पवार, उदय होला आणि स्वरूपमा चतुर्वेदी यांचा समावेश आहे.
विशेष हितसंबंध जपण्यासाठी न्यायव्यवस्थेची अखंडता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक विशिष्ट गट न्यायालयीन निर्णयांवर प्रभाव टाकण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब करत आहे. हा दबाव विशेषतः राजकीय व्यक्ती आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांशी संबंधित प्रकरणांमध्ये जास्त दिसून येतो. या गटातर्फे बऱ्याचदा राजकीय फायद्यासाठी न्यायव्यवस्थेच्या तथाकथित ‘सुवर्णयुगा’बद्दल भ्रामक गोष्टी पसरवून सर्वांची दिशाभूल केली जाते, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या विशिष्ट गटाच्या एकंदरीत कार्यप्रणालीमुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होईल. म्हणूनच न्यायव्यवस्थेवर राजकीय फायद्यासाठी होणाऱ्या छुप्या हल्ल्यांविरोधात बोलण्याची गरज आहे, असेही त्यात म्हटले आहे.