ऑस्ट्रेलियात क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये अपराजीत राहून मोठ्या दिमाखात न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाचा नक्षा रविवारी संपलेल्या टी-२० मालिकेत अनपेक्षितरीत्या उतरला. पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने बरोबरी साधली होती. परंतु पहिल्या सामन्याप्रमाणेच पुन्हा एकदा तिसऱ्या सामन्यातही दोनशे धावांचा टप्पा न्यूझीलंडच्या फलदाजांनी पार केला आणि गोलंदाजांनी या संधीचा पुरेपूर फायदा उठवित मालिका खिशात घातली. मात्र त्याआधी झालेल्या एक दिवसाच्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने एका सामन्याचा अपवाद वगळता पूर्ण वर्चस्व गाजविले. लागोपाठ दोन परदेश दौऱ्यांत अपरजीत राहण्याचा मान मिळविण्यात मात्र त्यांना अपयश आले. अर्थात कर्णधार विराट कोहली या मालिकेत खेळत नव्हता हा एक भाग झाला त्याचबरोबर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आणि त्याचबरोबर गोलंदाजांनीही सरस कामगिरी बजावत मालिका आपल्या ताब्यात ठेवली, हेही तेवढेच सत्य आहे. महिलांच्या संघाला व्हाईटवॉश घ्यावा लागला. एक दिवसाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आता काही महिनेच बाकी राहिले असताना परदेश दौऱ्यांतून पुरुष आणि महिला भारतीय संघाची बांधणी चालू आहे. विश्वचषकासाठी सर्वोत्तम संघाची निवड करण्याच्या दृष्टीने अधिकाधिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय सामन्यांतून संधी देण्याचे प्रयोग सध्या चालू आहेत. त्यामुळे न्यूझीलंडमधील टी-२० मालिकेतील हार हा फार चिंतेचा विषय ठरत नाही. उलट विजयाच्या रथावर स्वार असताना अचानक पराभवाची चव चाखावी लागल्यामुळे खेळाडू आणि संघ व्यवस्थापनही अधिक सावध बनेल.