कॉर्पोरेट मंत्रालयाच्या मते, मार्च २०२४ अखेर देशात २६,६३,०१६ कंपन्यांची नोंदणी झाली होती. देशात ५१६४ विदेशी कंपन्याही आहेत.
नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था सध्या वेगाने प्रगती करत आहे. भारत सरकार देशातील उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे जेणेकरून लोक नोकरी शोधणाऱ्यांऐवजी रोजगार निर्माण करणारे बनतील. या प्रयत्नांचे परिणाम जवळपास प्रत्येक आघाडीवर दिसत आहेत. देशाच्या आर्थिक प्रगतीचा एक भाग होण्यासाठी भारतीयांमध्ये प्रचंड उत्साह आहे. यामुळेच देशातील कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात दररोज ५०० हून अधिक कंपन्या सुरू होत आहेत. आर्थिक वर्ष २०२४ अखेर देशात एकूण २६ लाखांहून अधिक कंपन्या उघडल्या गेल्या आहेत.
अधिकृत आकडेवारीनुसार, मार्च २०२४ अखेर देशात २६,६३,०१६ कंपन्या उघडल्या होत्या. त्यापैकी १६,९१.४९५ कंपन्या (६४ टक्के) सक्रिय आहेत. गेल्या आर्थिक वर्षात देशात १.८५ लाखांहून अधिक कंपन्यांची नोंदणी झाली होती. हा आकडा एक वर्षापूर्वीच्या तुलनेत खूप जास्त आहे. मार्च महिन्यातच सुमारे १६,६००कंपन्यांची नोंदणी झाली आहे. आकडेवारीनुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षात १,५९,५२४ कंपन्यांची नोंदणी झाली होती. त्यांचे एकंदतरीत पेड अप कॅपिटल रु. १८,१३२.१६ कोटी होते.
कॉर्पोरेट मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस देशात किमान ९,३१,६४४ कंपन्या बंद झाल्या होत्या. याशिवाय २,४७०कंपन्या निष्क्रिय होत्या आणि १०,३८५ कंपन्या दिवाळखोरीत गेल्या आहेत. यासोबतच २७,०२२ कंपन्या अधिकृत रेकॉर्डमधून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू होती. २०२३-२४ या आर्थिक वर्षात नोंदणीकृत १,८५,३१२ कंपन्यांचे एकूण पेड अप कॅपिटल ३०,९२७.४० कोटी रुपये होते. या एकूण कंपन्यांपैकी ७१ टक्के सेवा क्षेत्रात, २३ टक्के औद्योगिक क्षेत्रात आणि ६ टक्के कृषी क्षेत्रात सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्रात सर्वाधिक १७.६ टक्के नवीन कंपन्यांची नोंदणी झाली आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत देशात ५१६४ विदेशी कंपन्यांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी ३२२८ कंपन्या (६४ टक्के) सक्रिय होत्या. मार्च २०२४ मध्ये, भारतातील कंपन्यांचे ६७ टक्के संचालक पुरुष आणि ३३ टक्के महिला होत्या. ४३ टक्के नवीन संचालक ३१ ते ४५ वयोगटातील आहेत.