वीज खात्यातर्फे १२ हजार कोटी खर्चूनही जीवित हानी रोखण्यात अपयश : खलप

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
19th April, 03:35 pm
वीज खात्यातर्फे १२ हजार कोटी खर्चूनही जीवित हानी रोखण्यात अपयश : खलप

पणजी : गोवा विद्युत विभागाचे कर्मचारी मनोज जांबावलीकर यांचा कर्तव्य बजावताना  विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी ऐकून धक्का बसला. २०२९ ते २०२४ या काळात जवळपास ७१ व्यक्ती आणि ३० प्राणी विजेच्या धक्क्याने मरण पावले. तब्बल १२ हजार कोटी खर्चून वीज यंत्रणा अद्यायावत केल्यानंतरही ही जीवितहानी रोखण्यात अपयश आले आहे. वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी केली आहे.

वीजमंत्री ढवळीकर यांनी गोवा विधानसभेत माहिती दिली आहे. गोवा सरकारने गेल्या ५ वर्षांत गोव्यात वीज वितरण प्रणाली सुधारण्यासाठी १२ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत, असे त्यात नमूद केले आहे. एवढा मोठा खर्च करूनही लोकांचे मृत्यू सुरूच असून लोकांना वीज पुरवठा संकटाचाही सामना करावा लागत आहे, असे खलप यांनी म्हटले आहे.

गोव्यात वीज पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. उद्योगपती, व्यापारी आस्थापने आणि सरकारी विभाग यांच्याकडून अनेक कोटी रुपयांची मोठी थकबाकी वसूल करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. तथापि, दोन महिन्यांसाठी गरीब लोकांचे ५०० रुपये चुकल्यास सरकार त्यांचे घरगुती वीज कनेक्शन तोडण्यास तत्परता दाखवते, असे खलप यांनी म्हटले आहे.

हेही वाचा