-एका तरुणाला बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकवल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या तरुणीला बरेली न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. स्त्रीप्रमाणेच पुरुषही विपरीत गोष्टींच्या भक्ष्यस्थानी पडतात. अनुचित फायद्यांसाठी महिलांनी कोणत्याही पुरुषावर याप्रकारचे आरोप करणे सर्वथा चुकीचे आहे असे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदवले आहे.
बरेली : बरेलीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बलात्काराच्या खोट्या प्रकरणात अडकलेल्या मुलाला त्याने न केलेल्या गुन्ह्यासाठी ४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान मुलीने आपली साक्ष मागे घेतली नसती तर हे कधीच कळले नसते. खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या तरुणीवर आता न्यायालयाने कडक भूमिका घेतली आहे.
२ सप्टेंबर २०१९ रोजी या मुलाविरुद्ध बारादरी पोलिस ठाण्यात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी मुलाला अटक करून कारागृहात पाठवले. या संपूर्ण प्रकरणात मुलीने मुलावर तिला नशायुक्त खाद्यपदार्थ खाऊ घालत, दिल्लीला नेऊन खोलीत कोंडून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी कोर्टात साक्ष देताना मुलीने आपला जबाब वारंवार बदलला, त्यानंतर कोर्टाने मुलाची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणाचे वास्तव न्यायालयासमोर आल्यावर न्यायालयाने त्या मुलाची निर्दोष मुक्तता केली आणि मुलीलाही अशीच शिक्षा सुनावली. न्यायालयाने सांगितले की, मुलाने किती दिवसांची शिक्षा भोगली आहे. मुलीलाही तेवढेच दिवस तुरुंगात काढावे लागणार आहेत. याशिवाय न्यायालयाने मुलीला आर्थिक दंडही ठोठावला आहे. जर मुलगा तुरुंगाबाहेर राहिला असता तर त्या काळात त्याने कर्मचारी म्हणून किमान ५ लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांहून अधिक कमावले असते, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे ही रक्कम मुलीकडून वसूल करून मुलाला देण्यात यावी. तसे न झाल्यास मुलीला ६ महिन्यांची अतिरिक्त शिक्षाही भोगावी लागेल असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याची सुनावणी करताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश ज्ञानेंद्र त्रिपाठी यांच्या न्यायालयाने तीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. या घटनेत न्यायालयाने कडक भूमिका घेत अशा महिलांच्या कृत्यामुळे खऱ्या पीडितांनाच नुकसान सहन करावे लागत असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी न्यायालयाने म्हटले की, समाजासाठी हे अत्यंत गंधोकादायक आहे. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पोलीस आणि न्यायालय या माध्यमांचा वापर करणे आक्षेपार्ह आहे. न्यायालयाने पुढे म्हटले की, महिलांना अनुचित फायद्यासाठी पुरुषांच्या हितावर हल्ला करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. पुरुषांकडून पैसे उकळण्यासाठी खोट्या केसेस दाखल करणाऱ्या महिलांसाठी हे प्रकरण एक आदर्श निर्माण करेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे २०१९ सालचे प्रकरण आहे. एका मुलीच्या आईने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता, ज्यामुळे अजय उर्फ राघवला तुरुंगात जावे लागले होते. तुरुंगात गेल्यानंतर, जेव्हा तिचा खटला कोर्टात चालला तेव्हा पीडितेने आपले म्हणणे मागे घेतले आणि सांगितले की तिचे अपहरण झाले नाही तसेच बलात्कारही झाला नाही. त्यानंतर न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेत मुलीची खोटी साक्ष दिल्याप्रकरणी तुरुंगात रवानगी केली आणि राघवची सुटका झाली. न्यायालयाने मुलीला साडेचार वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली असून, पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.