घर कोसळल्याने १० लाखांचे नुकसान : मुख्यमंत्र्यांनी वितरीत केले धनादेश
साखळी : गोकुळवाडी साखळी येथील महेश भजे यांच्या घराचा बहुतेक भाग कोसळल्याने त्यांचे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले. या घराला लागूनच असलेल्या प्रशांत नाईक व प्रतिभा नाईक यांच्या घरालाही यामुळे हादरा बसल्याने त्यांचीही मोठी हानी झाली आहे. या तिन्ही कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ३ लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते नुकसानग्रस्तांना धनादेश वितरीत करण्यात आले.
साखळी येथील महेश भजे यांच्या घराच्या मातीच्या भिंती असलेला भाग धोकादायक बनला होता. भिंती कोणत्याही क्षणी कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. या भिंतीची माती सरकू लागल्याने स्थानिकांनी महेश भजे यांच्या घरातील सामान इतरत्र हलवून त्यांचेही स्थलांतर केले होते. चार दिवसांपूर्वी स्थलांतर केलेल्या रात्रीच या घराचा बहुतेक भाग कोसळला. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. तसेच सामान अगोदरच इतरत्र हलविल्याने सामानाचीही नासधूस झाली नाही.
या घराचा भाग कोसळल्याने मधील भिंत एकच असल्याने दुसऱ्या बाजूने असलेल्या प्रशांत नाईक व प्रतिभा नाईक यांच्याही घराला हादरा बसला आहे. त्यांचीही घराची एक बाजू धोकादायक झाली असून कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती आहे. सध्या त्यांच्या घराचेही बरेच नुकसान झाले आहे.
या घरांची नगरसेविका विनंती पार्सेकर व माजी नगराध्यक्ष राया पार्सेकर यांनी पाहणी करुन त्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी यासाठी प्रक्रिया सुरू करून पाठपुरावा केला. काहीच दिवसांमध्ये त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक सहाय्य मंजूर करून आणले. त्याचे धनादेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
पावसाळ्यात आपल्या घरांना धोका निर्माण होऊ नये यासाठी लोकांनी प्रथमच हळूहळू घरांचे दुरूस्तीकाम हाती घेणे आवश्यक आहे. या आपत्तीवेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बरीच मदत केली. त्यामुळेच नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करता आली. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खर्चानेही या कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, असे राया पार्सेकर यांनी सांगितले.
धोकादायक घरांची काळजी घ्या : मुख्यमंत्री
पावसाळ्यात कमकुवत बनलेली किंवा योग्य निगा न राखण्यात न आलेल्या घरांना धोका निर्माण होत असतो. हा धोका टाळावा व आपले नुकसानही होऊ नये यासाठी लोकांनी आपल्या घरांची काळजी घेणे आवश्यक आहे. नुकसान झाल्यानंतर मदत करण्यासाठी सरकार व आम्ही आहोतच, परंतु आपण नुकसानच होऊ नये यासाठी वेळोवेळी घरांची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी केले.