पणजी : गोव्यात तसेच देशात ७ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. मतदानादरम्यान हात धुतल्यानंतर मतदारांच्या हातावरील शाई पुसली जात असल्याची तक्रार काही लोकांनी केली. राज्याच्या अनेक भागात मतदानाच्या दिवशी असा प्रकार घडला. दरम्यान मुख्य निवडणूक आयोग या तक्रारींची चौकशी करून केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर करेल, असे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी सांगितले.
मतदान करताना मतदाराच्या बोटाला शाई लावली जाते. ही शाई बरेच दिवस टिकते. मतदानाच्या दिवशी हात धुतले तरी शाई जात नाही. बोगस मतदान रोखण्यासाठी ही शाई बोटांवर टिकणे गरजेचे आहे. शाई जात असल्याच्या तीन तक्रारी मुख्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला प्राप्त झाल्या. राज्यात ९ लाखांहून अधिक मतदारांनी मतदान केले. केवळ तीन मतदारांच्या बोटांवरील शाई कशी काय गेली याचा अहवाल चौकशीअंती मिळेल असे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा म्हणाले.
तसेच कर्मचाऱ्यांनी ती योग्य प्रकारे लावली आहे का याची खात्री करण्यासाठी शाई तपासली जाईल. म्हैसूर पेंट्सला शाई पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाने कंपनीकडूनही अहवाल मागवला आहे. अहवाल आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर तो सादर केला जाईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी सांगितले.