मृत आईवडिलांच्या बँक लॉकरमध्ये सापडले ३ कोटी... पण, पैशांना काडीचीही किंमत उरली नाही! मुले हताश

वडिलांच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी विदेशातून आलेल्या मुलांना बसला धक्का; किंमत नसलेल्या ३ कोटीं रुपयांना पाहून झाले हताश

Story: उमेश झर्मेकर |
08th May, 12:24 pm
मृत आईवडिलांच्या बँक लॉकरमध्ये सापडले ३ कोटी... पण, पैशांना काडीचीही किंमत उरली नाही! मुले हताश

म्हापसा : आपल्या पाठीमागे मुलांचे हाल होऊ नयेत. त्यांचे जीवन सुखकर व्हावे, यासाठी मनुष्य आयुष्यभर कष्ट करून पोटाला चिमटे काढून बँकेत पैसाअडका साठवून ठेवतो. दागदागिन्यांची सोय करून ठेवतो. पण, काळगती फिरली तर त्याचा लाभ मुलांना होईलच असे सांगता येत नाही. अशीच काळगती फिरल्याने म्हापशातील एका बँकेच्या लॉकरमध्ये आईवडिलांनी मृत्यूपूर्वी ठेवलेल्या तब्बल ३ कोटी रुपयांवर मुलांना पाणी सोडावे लागले आहे. नोटबंदीमुळे ही संपूर्ण रक्कम आता कालबाह्य झाल्याने त्यांना यातील एकाही पैशांचा लाभ मिळू शकला नाही. हे लॉकर पाहून बँक अधिकारीही चक्रावून गेले आहेत.

आईचे आधीच देहावसान झाले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी लॉकर उघडण्यासाठी विदेशातून मुले आली. त्यांना बँकेच्या तीन लॉकरमध्ये ५०० आणि १००० रुपयांची बंडले आढळली. त्यांची मोजणी केली असता ३ कोटींची रोकड असल्याचे स्पष्ट झाले. पण, नोटबंदीमुळे हे संपूर्ण धन कालबाह्य झाल्याचे पाहून तेही हवालदिल झाले.

बार्देश तालु्क्यातील एका गृहस्थाचे १२ वर्षांपूर्वी निधन झाले. त्याच्या पत्नीचे आधीच निधन झाले होते. त्यांची मुले परदेशात होती. हा गृहस्थ व त्यांच्या पत्नीने म्हापशातील एका बँकेत लॉकर उघडून तिथे किमती दागिने आणि रोकड ठेवली होती. स्वत:च्या नावे दोन तर पत्नीच्या नावे एक अशी तीन लॉकर त्यांनी बँकेकडून घेतली होती. पत्नीच्या निधनानंतर तिचेही लॉकर पतीच हाताळत होता.

वडिलांचे निधन होऊन १२ वर्षांनी त्या गृहस्थाची मुले परदेशातून गोव्यात आली. त्यानंतर गोव्यातील मालमत्ता विकून परदेशीच स्थायिक होण्याचा त्यांनी निश्चय केला. वडिलोपार्जित घराच्या पडताळणीवेळी या मुलांना बँकेची कागदपत्रे व लॉकरच्या चाव्या सापडल्या. त्यानंतर या मुलांनी संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सर्व पाठपुरावा केल्यानंतर बँक अधिकाऱ्यांनी मूळ लॉकरधारक वारसदारांना ती लॉकर्स उघडण्यास परवानगी दिली.

सोमवार, ६ मे रोजी बँकेची ही लॉकर्स १२ वर्षांनी उघडण्यात आली, तेव्हा तिन्ही लॉकर्समधील पैशांची बंडले आणि किमती दागिने पाहून मुलांसह बँक अधिकारीही चक्रावून गेले. त्यांनी ५०० रुपये आणि १००० रुपयांची सर्व बंडले बाहेर काढली. अधिकाऱ्यांनी ती मोजल्यावर जवळपास ३ कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले. पण, यातील एकाही पैशाचा मुलांना काहीही फायदा झाला नाही. कारण ८ नोव्हेंबर २०१९ रोजी केंद्र सरकारने ५०० रुपये आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकल्याचे घोषित केले आहे. याच नोटबंदीमुळे त्यांना आईवडिलांच्या पुंजीवर पाणी सोडवे लागले आहे. त्यांना फक्त लाखो रुपयांच्या घरात असलेल्या दागिन्यांवरच समाधान मानावे लागले आहे.

आईवडिलांनी एवढी मोठी पुंजी आपल्यासाठी मागे ठेवल्याची पुसटशी कल्पनाही मुलांना नव्हती. त्यांनी जेव्हा लॉकरमध्ये नोटांची बंडले पाहिली तेव्हा त्यांनाही त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. त्यांना आधी माहिती असते तर, सरकारने २०१९ मध्ये जेव्हा नोटबंदी लागू केली तेव्हाच मुलांना ही रक्कम कायदेशीर करून घेता आली असती. आता हतबल होऊन या कालबाह्य नोटांकडे बघण्यापलिकडे त्यांच्या हातात काहीही राहिले नाही.