हैदराबाद : अलीकडच्या काळात वातावरणात अचानक बदल होऊन उग्र नैसर्गिक आपत्ती कोसळण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. असाच प्रकार काल तेलंगणा राज्यात घडला आहे. हैदराबादमध्ये दोन दिवसांपूर्वी सायंकाळी पडलेल्या मुळधार पावसामुळे बच्चुपल्ली परिसरात भिंत कोसळल्याने सात मजुरांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये एका चार वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. दरम्यान, आणखी काहीजण या ढिगाऱ्याखाली आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
वरील दुर्घटना ७ मे रोजी संध्याकाळी घडली. मरण पावलेले सर्व ओडिशा आणि छत्तीसगडमधील स्थलांतरित मजूर होते. या सर्वांचे मृतदेह कालपर्यंत जेसीबीच्या सहाय्याने ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुपती राव मज्जी (२०), शंकर (२२), राजू (२५), खुशी (४), राम यादव (३४), गीता (३२) आणि हिमांशू (१४) अशी मृतांची नावे आहेत.
हैदराबाद आणि तेलंगणाच्या अनेक भागांत सोमवारी सायंकाळी ७ च्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील जनजीवन आजपर्यंत पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तासभर पडलेल्या पावसाने अनेक भागात पाणी साचले होते. तर अनेक ठिकाणी झाडे पडल्याने रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी झाली होती.
याचदरम्यान बच्चुपल्ली परिसरात एक भिंत कोसळून त्याखाली सातजण गाडले गेले होते. स्थानिक लोकांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि अधिकाऱ्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. कालपर्यंत ढिगारा हटवून सातही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामध्ये चार वर्षांच्या एका मुलाचा समावेश आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शहरातील गांधी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काहीजण असल्याने शोधकार्य अद्याप चालू आहे.