नवी दिल्ली : भारतात २०२४ च्या लोकसभा निवडणुका सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी १९ एप्रिल आणि २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान पूर्ण झाले आहे. निवडणुकीचा दुसरा टप्पा संपल्यानंतर सुमारे ४ दिवसांनी निवडणूक आयोगाने आता निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यातील मतदानाची अचूक आकडेवारी शेअर केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीतही मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अंतिम आकडे येईपर्यंत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता असल्याचेही यापूर्वी सांगण्यात आले होते.
दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकांची आकडेवारी निवडणूक आयोगाने मंगळवारी शेअर केली. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के तर दुसऱ्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याचं सांगण्यात येत आहे. आयोगाने सांगितले की, पहिल्या टप्प्यातील १०२ जागांसाठी झालेल्या मतदानात ६६.२२ टक्के पुरुष आणि ६६.०७ टक्के महिला मतदारांनी मतदान केले. त्याच वेळी, दुसऱ्या टप्प्यात ६६.९९ टक्के पुरुष आणि ६६.४२ टक्के महिला मतदारांनी ८८ जागांसाठी मतदान केले, मात्र २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ६९.६४ टक्के मतदान झाले.
लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर शेअर केलेल्या डेटामध्ये एकूण ६०.०३ टक्के मतदान झाले आहे. त्याचवेळी, निवडणुकीच्या २०२४ दुसऱ्या टप्प्यातील प्राथमिक आकडेवारीनुसार सुमारे ६०.९६ टक्के मतदान झाले आहे. मात्र, सर्व केंद्रांमधून शेवटचे अपडेट येईपर्यंत हा आकडा वाढण्याची अपेक्षा होती.
लोकसभा निवडणूक २०२४ अंतर्गत, निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी आणि निवडणुकीचा दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी पूर्ण झाला. आता तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक ७ मे २०२४ रोजी होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात एकूण ९४ जागांसाठी मतदान होणार आहे. या सर्व जागांचे निवडणूक निकाल आयोगाकडून एकाच वेळी ४ जून रोजी जाहीर केले जाणार आहेत.