भाजपने १० वर्षांत संविधानावर घातला घाला!.. कॅ. विरियातो यांचे काँग्रेसकडून समर्थन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
23rd April, 02:49 pm
भाजपने १० वर्षांत संविधानावर घातला घाला!.. कॅ. विरियातो यांचे काँग्रेसकडून समर्थन

पणजी : दक्षिण गोव्याचे काँग्रेस उमेदवार कॅ. विरियतो फर्नांडिस यांनी भारतीय संविधानावर वादग्रस्त विधान केल्यानंतर भाजपने त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यावरून प्रदेश काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे.  गेल्या १० वर्षांत भाजपच्या राजवटीत संविधानावर घालण्यात आला. पक्षांतरे, भ्रष्टाचार, महागाई, प्रदूषण, बेरोजगारी यावर उघड चर्चा करण्याचे आव्हान विरियतो यांनी भाजपला दिले आहे. त्यांनी ते स्वीकारावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच काही भाजप नेत्यांनी विरियातो यांच्या विधानाचा विपर्यास्त केला. कारगिल युद्धात विरियातो यांचे मोठे योगदान आहे, असेही पाटकर यांनी नमूद केले आहे.

देशभरात पक्षांतर करणाऱ्या भाजपला संविधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. गुन्हे, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, भाजपने १० वर्षांत गोव्याचा केलेला विनाश यावर बोलूया, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले.

भाजप सरकारने प्रतिकिलो १७५ रुपये आधारभूत किंमत न दिल्याने काजू शेतकरी  हवालदील झाले आहेत. संजीवनी साखर कारखाना बंद झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी हैराण झाले आहेत. भाजपने त्यांना राजकीय आरक्षण न दिल्याने एसटी समाज वैफल्यग्रस्त झाला आहे. चला यावर चर्चा करुया, असे आवाहन केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी केले आहे.

गोवा हे ‘ड्रग्ज डेस्टिनेशन’ बनल्याने गोमंतकीय भयभीत झाले आहेत. शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर रूपांतरण झाल्याने गोमंतकीयांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. गेल्या १० वर्षांत भाजपच्या राजवटीत सहकार क्षेत्र कोसळल्याने चिंतेचे वातावरण आहे. या सर्व मुद्द्यांवर तसेच भाजपकडून देशाच्या संविधानाला निर्माण झालेला धोका यावर चर्चा करू, असे काँग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप यांनी भाजपला आव्हान दिले आहे.