कारमालकाने चालकाविरुद्ध तक्रार न दिल्याने आश्चर्य

पणजी : दोनापावला येथील रस्त्यावर मंगळवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू कार चालवून तीन वाहनांना धडक देण्यात आली होती. या अपघातात नुकसान झालेल्या वाहनांपैकी महिंद्रा ईव्ही ही त्याच दिवशी सकाळीच खरेदी करण्यात आल्याचे समोर आले आहे. संबंधित वाहन मालकाने विमा कंपनीकडून नुकसानभरपाई घेणार असल्याचे सांगत तक्रार देण्यास नकार दिला.
दोनापावला सर्कलजवळ मंगळवार, १९ मे रोजी मध्यरात्री एका भरधाव आलिशान ‘बीएमडब्ल्यू एम ३४० आय’ कारने रस्त्यावरील तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याप्रकरणी पणजी पोलिसांनी कार चालक जगदीश सरदेसाई (वय २७, रा. दोनापावला) याच्यावर कारवाई केली आहे.
अपघातात महिंद्रा ईव्ही, स्कोडा रॅपिड आणि महिंद्रा थार या वाहनांचे नुकसान झाले. त्यापैकी महिंद्रा ईव्ही ही त्याच दिवशी सकाळीच खरेदी करण्यात आली होती. वाहन मालक आपल्या कुटुंबीयांसह नवीन वाहन घेऊन बाहेर पडला असताना दोनापावला येथे हा अपघात घडला.
मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्यामुळे झालेल्या या अपघातात मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली.