राज्यातील ईव्ही खरेदीच्या संख्येत किंचित वाढ

पणजी : मागील काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) खरेदीमध्ये विविध कारणांमुळे घट होत असल्याचे चित्र होते. मात्र, सतत होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे ग्राहक पुन्हा ईव्ही खरेदीकडे वळत आहेत. परिणामी, राज्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ईव्ही खरेदीचे प्रमाण १.४३ टक्क्यांनी वाढले असून, पेट्रोल वाहनांच्या खरेदीत ०.८५ टक्क्यांनी घट झाली आहे.
२०२५ मध्ये जानेवारी ते एप्रिल दरम्यान एकूण २८,२०७ वाहनांची नोंदणी झाली होती. यातील ३,३६५ (११.९२ टक्के) ईव्ही वाहने, तर २१,५६० (७६.४३ टक्के) पेट्रोल वाहने होती. २०२६ मध्ये याच चार महिन्यांत एकूण ३१,७४८ वाहनांची नोंदणी झाली असून त्यापैकी ४,२४० (१३.३५ टक्के) ईव्ही वाहने आणि २३,९९७ पेट्रोल वाहनांचा समावेश आहे.
केंद्र आणि राज्य सरकारने कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि हरित ऊर्जेचा वापर वाढवणे या उद्देशाने ईव्ही खरेदीसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. मात्र, पेट्रोल वाहनांच्या तुलनेत ईव्ही वाहनांच्या विक्रीनंतरच्या सेवेबद्दल ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत.
सर्व्हिसिंगदरम्यान सुटे भाग मिळण्यास उशीर होणे, पुरेसे स्पेअर पार्ट्स आणि चार्जिंग स्टेशन नसणे तसेच कंपनी वगळता अन्यत्र दुरुस्ती न होणे, यामुळे ईव्ही वाहनांचे प्रमाण काही काळ कमी झाले होते. मात्र, यंदाच्या पहिल्या चार महिन्यांतील आकडेवारी वाढ दर्शवत आहे.