पेयजल पुरवठामंत्री सुभाष फळदेसाई : डिजिटल स्मार्ट मीटर बसवणार, जलवाहिनी बदलणार

प्रतिनिधी। गाेवन वार्ता
मडगाव : राज्यातील सुमारे ४० टक्के पाणी जलवाहिन्यांतील गळती आणि चोरीमुळे वाया जाते. ही गळती व चोरीचे प्रमाण निम्म्याने कमी करण्याचा प्रयत्न आहे. डिजिटल स्मार्ट मीटर बसवणे, जलवाहिनी बदलण्याचेही प्रयत्न केले जातील, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
मंत्री सुभाष फळदेसाई पुढे म्हणाले की, राज्यातील ४० ते ५० वर्षे जुन्या जलवाहिन्यांतून पाण्याची गळती होत आहे. या जलवाहिन्या बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. राज्यासाठी ७०० एमएलडी पाणी उपलब्ध असून या सर्व पाण्याचा वापर करण्यात यावा यासाठी वर्षभरात प्रयत्न केले जातील. राज्यातील जे पाणी वाया जात आहे, त्यात कमी आणण्यात येईल. पाणी चोरी व गळतीचे प्रमाण कमी करत पाणी वाया जाण्याचे प्रमाण किमान ५० टक्के कमी करण्याचा पहिला प्रयत्न असेल. २०० एमएलडी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न असून पाण्याच्या विक्रीतून किती पैसे परत येतील व ग्राहकांवर आणखी भार पडणार नाही याची काळजी घेण्यात येईल.
खंदकातील पाण्याचा वापराचा प्रयत्न : मंत्री फळदेसाई
खाणीतील खंदकातील पाण्याचा वापर करण्याचा प्रयत्न आहे. खंदकातील पाण्यावर प्रक्रिया करून वापर करता येईल का यासाठी नमुने घेण्यात आले आहेत. प्राथमिक तपासणीत या पाण्यात हानिकारक द्रव्याचे प्रमाण कमी असून क्लोरिनेशनचीही आवश्यकता नसेल, असे परिणाम दिसून आले आहेत. हे पाणी साळावली धरणातील पाण्यापेक्षा चांगले आहे, असे निरीक्षण आले आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत चांगले निष्कर्ष मिळतील. यातून आगामी काळात पिण्याच्या पाण्याची समस्या राहणार नाही, असेही मंत्री फळदेसाई म्हणाले.