देशाचा दर ३.१६ टक्के : सहा वर्षांतील सर्वांत कमी दराची नोंद
पणजी : एप्रिल महिन्यात देशातील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर जुलै २०१९ नंतर सर्वांत कमी म्हणजेच ३.१६ टक्के होता. असे असले तरी एप्रिलमधील गोव्यातील महागाई दर (Inflation rate) देशात सर्वाधिक म्हणजेच ६.९५ टक्के इतका होता. एप्रिलमध्ये देशभरात अन्नधान्य, डाळी, फळे, मांस, मासे आदींच्या किमतीत किरकोळ घट झाली. यामुळे राष्ट्रीय महागाई दर कमी होता. हा मागील सहा वर्षांतील सर्वांत कमी महागाई दर ठरला आहे.
याआधी गोव्यात मार्चमध्ये महागाई दर ५.६३ टक्के, फेब्रुवारीत ४.७५ टक्के, तर जानेवारीमध्ये ४.६९ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता, तर मे २०२४ मध्ये महागाई दर सर्वांत कमी म्हणजे १.४ टक्के होता. केंद्रीय सांख्यिकी आणि अंमलबजावणी खात्याने जारी केलेल्या अहवालानुसार एप्रिलमध्ये तेलंगणा येथील महागाई दर सर्वांत कमी म्हणजे १.२६ टक्के होता, तर केंद्रशासित प्रदेशात दिल्लीतील महागाई दर १.७७ टक्के राहिला.
अहवालानुसार एप्रिल महिन्यात महागाई दर कमी किंवा जास्त होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अन्नाचा महागाई दर कमी होता. अन्न महागाई दर ग्रामीण भागात १.८५ टक्के, तर शहरी भागात १.६४ टक्के होता. तेलंगणानंतर महागाई दर कमी असण्यात असण्यात राजस्थान (२.१६ टक्के), गुजरात (२.५१ टक्के), उत्तर प्रदेश (२.५१ टक्के), आंध्र प्रदेश (२.५९ टक्के), मध्य प्रदेश (२.६३ टक्के), उत्तर प्रदेश (३.०१ टक्के), बिहार (३.११ टक्के) यांचा क्रमांक लागतो. तर केरळ (५.९४ टक्के), कर्नाटक (४.२६ टक्के), जम्मू आणि काश्मीर (४.२५ टक्के) या राज्यातील महागाई दर तुलनेने अधिक होता.
इंधन, शिक्षण क्षेत्रातील महागाई कमी
अहवालानुसार मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये इंधन, वीज, शिक्षण क्षेत्रातील महागाई कमी झाली आहे, तर गृह, आरोग्य, वाहतूक, दलान वळण क्षेत्रातील महागाई दर किरकोळ वाढ झाली आहे.