मुख्यमंत्री सावंत यांनी हरवळे येथे कार्यकर्त्यांसह आपल्या निवासस्थानी पाहीला कार्यक्रमाचा ११४ भाग
पणजी : पंतप्रधान मोदी यांनी आज त्यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या ११४ व्या भागात देशाला अनेक महत्त्वाच्या विषयांवर संबोधित केले. महत्त्वाचे म्हणजे मन की बात या कार्यकमाने आज दशकपूर्ती साजरी केली. मोदींनी या कार्यक्रमाच्या यशाचे श्रेय त्याचे भाषण ऐकणाऱ्या श्रोत्यांना देत, १० वर्षांपूर्वी विजयादशमीच्या दिवशी या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. इतकी वर्षे या कार्यक्रमाला पेम मिळाले. श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे शिल्पकार असल्याचे म्हटले.
समाजाची उन्नती व्हावी हे ध्येय समोर घेऊन काम करणाऱ्यांचा मन की बात मध्ये वेळोवेळी सन्मान केला जातो. जेव्हा प्रेक्षक-श्रोत्यांची पत्रे येतात तेव्हा आपल्या देशात खोलवर रुजलेल्या प्रतिभेची कल्पना येते. त्यांच्या पत्रातून त्यांची समाज आणि देशासंबंधी असलेल्या जबाबदारीच्या जाणिवेतून मला प्रेरणा मिळते, असे यावेळी मोदी म्हणाले. गेल्या १० दिवसांत देशाच्या विविध भागांत मुसळधार पाऊस पडत आहे, अशातच 'जल संरक्षण' हे किती महत्त्वाचे आहे हे सर्वांना उमजणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान त्यांनी उत्तराखंड येथील उत्तरकाशीमधील 'झाला' या गावाचा उल्लेख केला. या गावातील युवकांनी निसरगाप्रती असलेली आपली निष्ठा दाखवण्यासाठी एक खास उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाचे नाव 'धन्यवाद प्रकृती' असून याच्याद्वारे दररोज २ तास गावात स्वच्छता मोहिम राबवली जाते. गावातील गल्ल्या-मोहल्ल्यांतील कचरा एकत्र करून निर्धारित जागी नेत त्याची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.
स्वच्छता मोहिमेचे महत्त्व अधोरेखित करत समाजातील प्रत्येक घटकाला याच्याशी जोडण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कोणतेही अभियान हे एक तास, एक दिवस, एक आठवडा, एक महिना किंवा एका वर्षांचा नसतो. अभियान हे निरंतर सुरू राहणारे अनुष्ठान आहे. जोपर्यंत स्वच्छता आमचा स्थायी स्वभाव बनत नाही तोपर्यंत आपणास काम करायचे आहे, असे ते म्हणाले. यादरम्यान त्यांनी वनौषधींचे महत्त्व देखील अधोरेखित केले.
यावेळी त्यांनी आपल्या अमेरिकेतील दौऱ्याविषयी माहिती दिली. अमेरिकन सरकारने त्याच्या ताब्यात असलेल्या तब्बल ३०० ऐतिहासिक महत्त्वप्राप्त कलाकृती भारताला परत केल्याचे ते म्हणाले. या दौऱ्यात अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन यांनी त्यांच्या खाजगी आवासातील काही मूर्ती देखील मोदींना दाखवल्या. भारताला परत करण्यात आलेल्या या कलाकृति टेराकोटा, तांबे, दात, हाडे, काच, लाकूड तसेच दगडापासून बनवलेल्या आहेत. यातील अनेक मूर्ती या तब्बल ३ ते ४ हजार वर्षांपूर्वीच्या आहेत असे मोदी म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हरवळे येथील निवासस्थानी आपल्या कार्यकर्त्यांसह मन की बातचा ११४ एपिसोड पाहिला. सावंत यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनीही मोदींच्या भाषणाचा हवाला देत वनौषधीच्या वापरावर भाष्य केले. वनौषधी या गोव्याच्या संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. गोव्यातील रानावनात मोठ्याप्रमाणात यांचा भरणा आहे. लोकांनी त्याचा वापर करून आपले आरोग्य सुधारावे असे ते म्हणाले.
तसेच गोमंतकीयांनी नवरात्री आणि दिवाळीच्या सणात महिला सशक्तीकरणास वाव देत आणि 'व्होकल फॉर लोकल' या उपक्रमाला यथोचित साथ देत राज्यातील महिला स्वयंबचत गटांना मदत करावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.