खर्गे यांनी सोडले विरोधी पक्षनेतेपद

दिग्विजय, चिदंबरम जाऊ शकतात राज्यसभेवर


01st October 2022, 11:56 pm
खर्गे यांनी सोडले विरोधी पक्षनेतेपद

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यांनी शनिवारी सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. वास्तविक काँग्रेसमध्ये ‘एक व्यक्ती एक पद’ हे तत्त्व आहे. त्यानुसार खर्गे यांनी राजीनामा दिला. आता त्यांच्या जागी पी. चिदंबरम किंवा दिग्विजय सिंग राज्यसभेत येऊ शकतात, असे मानले जात आहे.

३० सप्टेंबर रोजी एकूण २० उमेदवारी दाखल करण्यात आले होते. यापैकी ४ अर्ज हे छाननी समितीने नाकारले आहेत. के. एन. त्रिपाठी यांचा अर्ज विहित निकषांची पूर्तता करत नसल्याने नाकारण्यात आला. आता काँग्रेस अध्यक्षपदासाठी सध्याचे दोन दावेदार मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर यांचा समावेश आहे. अर्ज मागे घेण्यासाठी ८ ऑक्टोंबरपर्यंत वेळ आहे, त्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. कोणीही नावे मागे न घेतल्यास मतदान प्रक्रिया सुरू होईल, असे काँग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले.

खर्गे २०२१ मध्ये झाले होते विरोधी पक्षनेते

काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर २०२१ मध्ये गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये खर्गे यांना राज्यसभेत विरोधी पक्षनेते बनवण्यात आले होते. खर्गे यांच्या प्रवेशानंतर दिग्विजय अध्यक्षपदाच्या शर्यतीतून स्वतः बाहेर पडले. पक्ष आणि हायकमांड यांच्या विश्वासू नेत्यांपैकी ते एक असून विरोधी पक्षनेतेपदासाठी त्यांची पहिली पसंती असल्याचे बोलले जात आहे.

‘एक व्यक्ती एक पद’ काय आहे?

‘एक व्यक्ती, एक पद’ या तत्त्वानुसार काँग्रेस पक्षाचा कोणताही नेता एकाच वेळी दोन पदे भूषवू शकत नाही. या तत्त्वानुसार, पक्षाला संघटनेतील प्रत्येक स्तरावर ५० टक्के पदांवर ५० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या तरुण चेहऱ्यांना संधी द्यायची आहे.

या अंतर्गत कोणतीही व्यक्ती पाच वर्षांपेक्षा जास्त काळ पक्षाचे पद भूषवू शकत नाही. कार्यकाळ संपल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो. जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही पदावर परत यायचे असेल तर त्याला तीन वर्षांच्या कालावधीनंतरच संधी दिली जाईल.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना २२ सप्टेंबर रोजी जारी करण्यात आली होती. २४ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली, ती ३० पर्यंत चालली. ८ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होईल आणि १९ऑक्टोबरला निकाल जाहीर होईल.